तुळींज पोलिसांनी २६ मोबाईल केले नागरिकांना परत, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मोबाईल केले परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 16:05 IST2024-01-27T16:04:18+5:302024-01-27T16:05:21+5:30

२६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गहाळ झालेले तब्बल २६ मोबाईल तुळींज पोलिसांनी नागरिकांना परत केले आहे.

Tulinj Police returned 26 mobile phones to citizens on the occasion of Republic Day | तुळींज पोलिसांनी २६ मोबाईल केले नागरिकांना परत, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मोबाईल केले परत

तुळींज पोलिसांनी २६ मोबाईल केले नागरिकांना परत, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मोबाईल केले परत

नालासोपारा (मंगेश कराळे) :- मोबाईल हा मानवाचा अभिवाज्य भाग बनला आहे. एकदा मोबाईल हरवला की तो पुन्हा परत मिळण्याची आशाच सोडून दिली जाते. एवढ्या प्रचंड लोकसंख्येत पोलिस तरी कसा शोध लावणार या निष्कर्षावर नागरिक येतात. पण तंत्रज्ञान एवढे विकसित झाले की कुठलीही गोष्ट अशक्य नाही. अनेकदा मोबाईल हरवल्यानंतर तो परत मिळण्याची शक्यता कमी असते. ही शक्यता तुळींज पोलिसांनी खोडून काढली आहे. २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गहाळ झालेले तब्बल २६ मोबाईल तुळींज पोलिसांनी नागरिकांना परत केले आहे.

तुळींज पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात दाट वस्ती असून आठवडी बाजार, रेल्वे स्टेशन परिसरातून गहाळ झालेल्या मोबाईल बाबत तुळींज पोलिसांना नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठांच्या सूचनेनुसार तुळींजच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या या मोबाईलचा तपास घेऊन ते शोधून काढले. २६ जानेवारीचे औचित्य साधून तुळींजचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांच्या मूळ मालकांना परत केले. हरवलेले मोबाईल फोन मिळण्याची आशा नसता नाही पोलिसांनी ते शोधून त्यांच्या मालकांना पोचून एक अनोखी भेट दिल्याने मोबाईल फोन मालकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. मोबाईल परत मिळाल्यानंतर लोकांनी पोलिसांचे आभार मानले आहे. पोलिसांनी २ लाख ६० हजार रुपयांचे एकूण २६ मोबाईल शोधून काढले असून त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. 

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, तुळींजचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे आणि तुळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक मिथुन म्हात्रे, सहाय्यक फौजदार बाळू बांदल, शिवानंद सुतनासे, पोलीस हवालदार आनंद मोरे, उमेश वरठा, अशपाक जमादार, पांडुरंग केंद्रे, छपरीबन, राहुल कदम, बागुल, अमोल बर्डे यांनी अथक मेहनत करून मोबाईलचा शोध लावला आहे.

Web Title: Tulinj Police returned 26 mobile phones to citizens on the occasion of Republic Day