वाहतूककोंडीने घेतला सफाळेतील महिलेचा बळी, अंगावर पडले झाड; उपचारास झाला विलंब
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:54 IST2025-08-06T13:54:20+5:302025-08-06T13:54:34+5:30
मुंबई-अहमदाबाद महामर्गावर वारंवार वाहतूककोंडी होते. निष्पाप छाया पुरव यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वाहतूककोंडीने घेतला सफाळेतील महिलेचा बळी, अंगावर पडले झाड; उपचारास झाला विलंब
पालघर : सफाळे मधुकरनगर येथे राहणाऱ्या छाया कौशिक पुरव या महिलेच्या अंगावर झाड पडून त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात उपचारासाठी रुग्णवाहिकेतून नेण्यात येत होते. मात्र, रुग्णवाहिका मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकली. त्यामुळे उपचार न मिळाल्याने रुग्णवाहिकेतच त्यांचा मृत्यू झाली. ही घटना शनिवारी घडली. या घटनेमुळे सफाळे परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अहमदाबाद महामार्गावर तीन तास वाया गेले
महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर सकाळपासूनच वाहतूक कोंडी झाल्याने त्यांची या कोंडीतून सुटका होऊ शकली नाही. सुमारे तीन ते चार तास रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकून पडल्याने त्यांची प्रकृती खालावली.
त्यामुळे त्यांना जवळच रस्त्यालगत असलेल्या मीरा रोड येथील एका खासगी रुग्णालयात नेले; परंतु त्यांच्या उपचारासाठी असलेला ‘गोल्डन अवर’चा अमूल्य वेळ वाहतूक कोंडीत वाया गेल्याने डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
मुंबई-अहमदाबाद महामर्गावर वारंवार वाहतूककोंडी होते. निष्पाप छाया पुरव यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.