प्रजासत्ताक दिनाचे औचित्य; पेल्हारने ५५ तर तुळींजने ३५ मोबाईल केले परत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 17:25 IST2025-01-27T17:25:18+5:302025-01-27T17:25:32+5:30
२६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गहाळ झालेले पेल्हारने ५५ तर तुळींजने ३५ मोबाईल नागरिकांना परत केले आहे.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य; पेल्हारने ५५ तर तुळींजने ३५ मोबाईल केले परत
मंगेश कराळे -
नालासोपारा : मोबाईल हा मानवाचा अभिवाज्य भाग बनला आहे. एकदा मोबाईल हरवला की तो पुन्हा परत मिळण्याची आशाच सोडून दिली जाते. एवढ्या प्रचंड लोकसंख्येत पोलिस तरी कसा शोध लावणार या निष्कर्षावर नागरिक येतात. पण तंत्रज्ञान एवढे विकसित झाले की कुठलीही गोष्ट अशक्य नाही. अनेकदा मोबाईल हरवल्यानंतर तो परत मिळण्याची शक्यता कमी असते. ही शक्यता पेल्हार आणि तुळींज पोलिसांनी खोडून काढली आहे. २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गहाळ झालेले पेल्हारने ५५ तर तुळींजने ३५ मोबाईल नागरिकांना परत केले आहे.
पेल्हार आणि तुळींज पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात दाट वस्ती असून आठवडी बाजार, रेल्वे स्टेशन परिसरातून गहाळ झालेल्या मोबाईल बाबत पेल्हार आणि तुळींज पोलिसांना नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठांच्या सूचनेनुसार पेल्हार व तुळींजच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या या मोबाईलचा तपास घेऊन ते शोधून काढले. २६ जानेवारीचे औचित्य साधून पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी आणि तुळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्या हस्ते रविवारी सकाळी पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांच्या मूळ मालकांना परत केले. हरवलेले मोबाईल फोन मिळण्याची आशा नसता नाही पोलिसांनी ते शोधून त्यांच्या मालकांना पोचून एक अनोखी भेट दिल्याने मोबाईल फोन मालकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. मोबाईल परत मिळाल्यानंतर लोकांनी पोलिसांचे आभार मानले आहे.
पेल्हार पोलिसांनी ८ लाख २५ हजार रुपयांचे ५५ मोबाईल तर तुळींज पोलिसांनी ५ लाख रुपये किंमतीचे ३५ मोबाईल शोधून काढले असून त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. पेल्हार आणि तुळींज गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी व पोलीस अंमलदारांनी अथक मेहनत करून मोबाईलचा शोध लावला आहे.