वसईतल्या महसूल विभागा विरोधात भूमीपुत्रांचा मोर्चा; आवश्यक सेवा, सुविधा दिल्या जात नसल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 16:38 IST2026-03-18T16:35:38+5:302026-03-18T16:38:02+5:30
'छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान' अंतर्गत महसूल विभागाने मागील काही दिवसात विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

वसईतल्या महसूल विभागा विरोधात भूमीपुत्रांचा मोर्चा; आवश्यक सेवा, सुविधा दिल्या जात नसल्याचा आरोप
नालासोपारा (मंगेश कराळे) : स्थानिक भूमिपुत्रांच्या महसूल कामांतील दिरंगाई बाबत निषेध व्यक्त करण्यासाठी भूमिपुत्र रोजगार हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष सुशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी वसई तहसीलदार कार्यालयासमोर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
'छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान' अंतर्गत महसूल विभागाने मागील काही दिवसात विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमधून नागरिकांना आवश्यक सेवा, सुविधा दिल्या जात नसल्याचा आरोप सदर संघटनेने केला. अधिकारी व कर्मचारी वेळेत सेवा देत नाहीत, त्यामुळे नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. परिणामी नागरिकांना आवश्यक सेवेचा लाभ मिळत नाही. तालुक्यात या अभियानाचा प्रभावी प्रसार, प्रचार होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचा आरोप या तक्रारी निवेदनातुन करण्यात आला आहे.
याबरोबरच तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकारी मनमानी कारभार करीत असल्यामुळे व्यवस्थापन भ्रष्ट झालेले आहे. जाणीवपूर्वक स्थानिक भूमिपुत्रांची कामे प्रलंबित ठेवली जातात याची माहिती तहसीलदारांनी घेणे अपेक्षित असल्याचे मत यावेळी आंदोलकांनी व्यक्त केले. यावर आवश्यक कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे म्हटले आहे.
आंदोलन स्थळी आदिवासी 'तारपा नृत्य' करून सकाळी या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी विविध पक्षाचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. तहसीलदारांनी आंदोलन स्थळी येऊन आंदोलन कर्त्याच्या मागण्या ऐकून घ्याव्यात या मागणीसाठी काही काळ येथील मुख्य प्रवेशद्वार गर्दी करून बंद केले होते.
त्याची दखल घेत वसईचे तहसीलदार दीपक गायकवाड हे आंदोलन करताना प्रत्यक्ष येऊन भेटले. यावेळी नायब तहसीलदार राजाराम देवकाते, पुरवठा निरीक्षक अधिकारी भागवत सोनार उपस्थित होते. त्यांनी उपस्थित आंदोलन कर्त्यांच्या मागण्या व समस्या ऐकून घेतल्या व त्यानंतर त्यांना तहसीलदार दालनात चर्चेसाठी आमंत्रित केले. यावेळी तहसीलदारांनी आंदोलन करताना आवश्यक ठिकाणी तात्काळ कारवाईचे आश्वासन दिले आहे. तसेच राजस्व अभियाना बाबतचे प्रत्यक्ष कामकाज कशा स्वरूपात चालते त्याची माहिती आंदोलनकर्त्यांना दिली.