मिरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालय क्षेत्रात खून, बलात्कार, अपहरणचे गुन्हे वाढले तर घरफोडी, चोरी, दरोडा, विनयभंगाचे गुन्हे झाले कमी
By धीरज परब | Updated: January 28, 2026 21:18 IST2026-01-28T21:17:58+5:302026-01-28T21:18:24+5:30
मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाचा २०२५ चा वार्षिक अहवाल. खुनाचे ४४ तर बलात्काराचे ४६६ गुन्हे दाखल. चोरी आणि घरफोडी रोखण्यात पोलिसांना यश. वाचा सविस्तर आकडेवारी.

मिरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालय क्षेत्रात खून, बलात्कार, अपहरणचे गुन्हे वाढले तर घरफोडी, चोरी, दरोडा, विनयभंगाचे गुन्हे झाले कमी
- धीरज परब
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २०२५ ह्या वर्षात खून, बलात्कार, अपहरण, मारामारी आदी गुन्हे वाढले तर घरफोडी, चोरी, दरोडा, विनयभंगाचे गुन्हे कमी झाले आहेत. गुन्ह्यांचे प्रमाण किंचित कमी झाले असून २०२४ साली भाग १ ते ५ चे ६ हजार ७५६ गुन्हे दाखल झाले होते. २०२५ साली त्यात किंचित घट होऊन गुन्ह्यांची संख्या ६ हजार ६२५ इतकी नोंदवली गेली आहे.
मानवी शरीर संबंधी तसेच गंभीर स्वरूपातील गुन्हे हे भाग १ ते ५ गुन्हे मद्ये पोलीस नोंद करत असतात. मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तलयात मीरा भाईंदर, वसई आणि विरार अश्या ३ परिमंडळ मध्ये विभागणी झालेली आहे. पोलीस आयुक्तालयाच्या वार्षिक नोंदी नुसार २०२४ साली हत्येचे ३२ गुन्हे दाखल होते. २०२५ साली मात्र त्यात १२ ने वाढ होऊन खुनाचे ४४ गुन्हे घडले आहेत. त्यातील ४३ खुनाचे गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत.
२०२४ साली खुनाच्या प्रयत्नचे ५० गुन्हे घडले होते. २०२५ सालात खुनाचा प्रयत्नचे गुन्हे ५ ने वाढून ५५ झाले आहेत. अपहरणचे २०२४ साली ६७० गुन्हे घडले होते. २०२५ मध्ये मात्र अपहरणाचे गुन्हे ८९ ने वाढून ७५९ इतके झाले आहेत. अपहरणाचे गुन्हे हे मुख्यतः अल्पवयीन मुलींच्या बाबतीत जात आहेत. दाखल गुन्ह्यातील ६८९ अपहरणाचे गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत.
गर्दी - मारामारीचे २०२५ सलात ३०३ गुन्हे नोंदवले असून २०२४ सालात ह्याच गुन्ह्यांची संख्या २३७ इतकी होती. दुखापतचे गुन्हे २०२५ सालात १ हजार १०९ इतके असून २०२४ सालात याची संख्या १ हजार ६४ इतकी होती. ह्या दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यात अनुक्रमे ६६ आणि ४५ ने वाढ झालेली आहे.
महिलांच्या संदर्भातील गुन्ह्यात बलात्काराचे गुन्हे हे २०२५ सालात ५४ ने वाढले आहेत. २०२४ साली बलात्काराचे दाखल गुन्हे ४१२ होते. २०२५ मध्ये ती संख्या ४६६ इतकी झाली आहे. विनयभंगचे गुन्हे मात्र कमी झाले असून २०२४ मध्ये ५५५ गुन्हे होते तर २०२५ मध्ये ती संख्या २८ ने कमी होऊन ५२७ इतकी झाली आहे.
दरोड्यांचे गुन्हे बाबत २०२४ साली ९ असलेले गुन्हे २०२५ साली ५ वर आले आहेत. तर दरोड्याचा प्रयत्न प्रकरणी २०२४ साली दाखल १ गुन्ह्यात वाढ होऊन २०२५ मध्ये या बाबत ३ गुन्हे दाखल झाले आहेत.
पोलिसांना जबरी चोरी, घरफोडी, चेन स्नॅचिंग, वाहन चोरी व अन्य चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यात चांगले यश आल्याचे आकडेवारी वरून दिसतेय. २०२४ मद्ये जबरी चोरी - चेन स्नॅचिंग चे ११५ गुन्हे घडले होते. २०२५ मध्ये ह्याच गुन्ह्यांचे प्रमाण ४६ ने कमी होऊन ६९ वर आले आहे. दिवसा व रात्री घडणाऱ्या घरफोडींचे गुन्हे आटोक्यात आणण्यात पोलिसांनी चांगली कामगिरी केली आहे. २०२४ साली ३३१ इतके घरफोडीचे गुन्हे दाखल होते. २०२५ मध्ये मात्र त्यात तब्बल १४८ ने घट येऊन घरफोडीचे गुन्हे १८३ इतके दाखल झाले आहेत.
वाहन चोरीच्या गुन्ह्यां मध्ये १६६ ने कमतरता आली आहे. २०२४ साली ४६१ वाहन चोरीचे गुन्हे दाखल होते. २०२५ सालात ती संख्या २९५ वर आली आहे. तर अन्य चोरीचे गुन्हे देखील कमी झाले असून २०२४ साली ५८२ इतकी नोंद होती. २०२५ मध्ये मात्र अन्य चोरीचे गुन्हे १६३ ने कमी होऊन ४१९ इतके घडले आहेत. चोरीच्या एकूण गुन्ह्यांमध्ये तब्बल ५२३ संख्येची घट आली असून पोलिसांची वाढती गस्त, चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीना पकडण्यात आलेले यश आदी कारणे या मागे सांगितली जात आहेत.
प्राण घातक अपघातांचे गुन्हे हे २०२४ साली २०१ इतके तर २०२५ साली त्यात ६ ने वाढ होऊन २०७ इतके झाले आहेत. भारतीय न्याय संहिता नुसार अन्य दाखल गुन्ह्यांची संख्या २०२४ साली २ हजार ३० इतकी होती. त्या गुन्ह्यांची संख्या २०२५ मध्ये २ हजार १५९ इतकी झाली आहे.
भाग ६ च्या गुन्ह्यात अमली पदार्थ, दारूबंदी, जुगार, मोक्का व अन्य गुन्ह्यांचा समावेश होतो. २०२५ मध्ये ह्या गुन्ह्यांची संख्या ३ हजार ६१७ इतकी असून त्यातील ३ हजार ५९४ गुन्हे उघडकीस आले असल्याचा पोलिसांचा दावा आहे. अमली पदार्थ प्रकरणी १ हजार २०८ गुन्हे, दारूबंदी प्रकरणी ४७६ तर जुगाराचे २६ गुन्हे दाखल झाले आहेत. मोक्काचे ३ गुन्हे दाखल केले गेले आहेत.