हार्दिक पाटील यांची ४३ वी 'आयर्नमॅन' स्पर्धा पूर्ण; कौस्तुभ राडकरांच्या विक्रमाशी केली बरोबरी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 05:16 IST2026-03-13T05:15:49+5:302026-03-13T05:16:10+5:30
२०२६ सालाच्या सुरुवातीलाच हा टप्पा गाठून हार्दिक पाटील आता भारताचे सर्वाधिक आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करणारे खेळाडू बनण्याच्या उंबरठ्यावर पोहचले आहेत.

हार्दिक पाटील यांची ४३ वी 'आयर्नमॅन' स्पर्धा पूर्ण; कौस्तुभ राडकरांच्या विक्रमाशी केली बरोबरी !
मंगेश कराळे
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा :- क्रीडा विश्वातील सर्वात खडतर मानल्या जाणाऱ्या 'आयर्नमॅन' (Ironman) स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण करणारे विरारचे सुपुत्र हार्दिक दयानंद पाटील यांनी जागतिक स्तरावर ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. नुकत्याच न्यूझीलंड येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन स्पर्धेत यशस्वी सहभाग नोंदवत हार्दिक पाटील यांनी आपल्या कारकिर्दीतील ४३ वी 'फुल आयर्नमॅन' स्पर्धा पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे, या कामगिरीसह त्यांनी भारताचे नामांकित ट्रायथलीट कौस्तुभ राडकर यांच्या ४३ आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करण्याच्या भारतीय विक्रमाची बरोबरी केली आहे. २०२६ सालाच्या सुरुवातीलाच हा टप्पा गाठून हार्दिक पाटील आता भारताचे सर्वाधिक आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करणारे खेळाडू बनण्याच्या उंबरठ्यावर पोहचले आहेत.
या ऐतिहासिक क्षणी आपली भावना व्यक्त करताना हार्दिक पाटील म्हणाले, न्यूझीलंडमधील ४३ वी आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करणे हा माझ्यासाठी केवळ एक विक्रम नसून, भारताला या खेळात जागतिक महासत्ता बनवण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.कौस्तुभ राडकर सरांच्या विक्रमापर्यंत पोहोचणे हा सन्मान आहे, पण माझे ध्येय याही पुढे आहे. या वर्षी मी जास्तीत जास्त स्पर्धा पूर्ण करून भारताचे नेतृत्व संपूर्ण जगात अधिक प्रकर्षाने सिद्ध करणार आहे. विरारच्या मातीने मला जी जिद्द दिली, तीच मला जागतिक स्तरावर लढण्याचे बळ देते.
हार्दिक पाटील यांच्या या अद्वितीय कामगिरीमुळे क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्यांच्या आगामी स्पर्धांकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. हार्दिक पाटील यांच्या या यशाने केवळ विरारच नव्हे तर संपूर्ण भारताची मान जागतिक क्रीडा क्षेत्रात उंचावली आहे.
१) ऐतिहासिक बरोबरी :- कौस्तुभ राडकर यांच्यानंतर ४३ पूर्ण आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करणारे हार्दिक पाटील हे दुसरे भारतीय खेळाडू ठरले आहेत.
२) न्यूझीलंडमधील यश :- अत्यंत आव्हानात्मक वातावरण आणि भौगोलिक परिस्थितीत न्यूझीलंड येथील स्पर्धा पूर्ण करून त्यांनी आपली जिद्द सिद्ध केली.
३) पुढील ध्येय :- या वर्षात आणखी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होऊन भारताचे नाव जागतिक स्तरावर प्रथम क्रमांकावर नेण्याचा त्यांचा संकल्प आहे.
४) देशाचे नेतृत्व :- केवळ स्पर्धा पूर्ण करणेच नव्हे, तर 'आयर्नमॅन'च्या माध्यमातून जागतिक पटलावर भारताचे नेतृत्व करण्याचे त्यांचे मानस आहे.