CoronaVirus: कोरोनाचा फटका वाड्यातील मिरची उत्पादकांना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 14:54 IST2020-04-08T14:53:20+5:302020-04-08T14:54:40+5:30
खर्चही निघणार नसल्याने शेतकरी मेटाकुटीला

CoronaVirus: कोरोनाचा फटका वाड्यातील मिरची उत्पादकांना
वाडा: कोरोना विषाणूचा फटका तालुक्यातील मिरची शेतीला बसला आहे. येथील शेतकऱ्यांनी परदेशात जाणारी दर्जेदार हिरव्या मिरचीची शेती केली आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशभरात लागू झालेल्या संचारबंदीमुळे हिरवी मिरची धुळीस मिळाली असून खर्चही निघणार नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
तालुक्यातील देवघर येथील आदर्श शेतकरी किशोर पाटील हे दरवषी आपल्या शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला शेती करून दर्जेदार पिके घेत असतात. यावषी त्यांनी प्रथमच मल्चिंग आणि ठिबक पद्धतीने ९१७ जातीच्या हिरव्या मिरचीचे चांगल्या प्रकारे उत्पादन घेतले आहे. मिरचीही अगदी बहरून आली आहे. या मिरचीला परदेशात खूप मागणी आहे. मात्र मिरची तयार झाली आणि कोरोना व्हायरसचे संकट आल्याने मिरचीचा भाव गडाडला व संचारबंदीमुळे मिरची बाहेर नेऊ शकत नसल्याने हे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.
किशोर पाटील यांनी दीड एकर जागेत नारायण गांव येथून ९१७या वाणाची परदेशात एक्सपोर्ट होणाऱ्या रोपांची लागवड केली असून त्यासाठी तब्बल अडीच लाख रूपये खर्च केला आहे. खरंतर त्यांना २० टन माल निघण्याची अपेक्षा होती. त्यातून ६ लाख रूपये मिळतील अशी त्यांना आशा होती. त्यातून खर्च काढून काही तरी फायदा मिळेल या आशेवर ते होते. परंतु लॉकडाऊनमुळे बाजार बंद झाल्याने त्यांच्या आशा मावळल्या. त्यांनी पिकासाठी सेवा सहकारी सोसायटीकडून घेतले होते. ते कर्ज फेडणाचे कसे आणि कुटुंब चालवायचे कसे असे प्रश्न त्यांच्यासमोर आहेत.
लॉकडाऊनमुळे मोठे नुकसान
मागील २० वर्षांपासून मी शेतीत नवनवीन प्रयोग करून पारंपरिक शेतीला छेद देत आधुनिक शेती करतो. मात्र या वषी पहिल्यांदाच अशी परिस्थिती उद्भवली असून कोरोना विषाणूमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत असून त्यातून बाहेर येण्यासाठी सरकारने मदत करावी हीच अपेक्षा.
- किशोर पाटील, मिरची उत्पादक शेतकरी, देवघर