युवकांच्या सतर्कतेमुळे आगीपासून बचावले गांव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 21:19 IST2019-04-16T21:19:07+5:302019-04-16T21:19:41+5:30
भरदुपारी उन्हाच्या तीव्र झळा सुरु असल्याने गावातील रस्ते सामसूम झाले होते. अशातच गावालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्यांने अचानक पेट घेतला. उन्हाचा तडाख्यात हवेची झुळूक आल्याने आगीने रौद्ररुप धारण केले.

युवकांच्या सतर्कतेमुळे आगीपासून बचावले गांव
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : भरदुपारी उन्हाच्या तीव्र झळा सुरु असल्याने गावातील रस्ते सामसूम झाले होते. अशातच गावालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्यांने अचानक पेट घेतला. उन्हाचा तडाख्यात हवेची झुळूक आल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. ही आग गावाच्या दिशेने सरकू लागली. याकडे गावातील सरपंच व युवकांचे लक्ष गेल्याने त्यांनी लागलीच धाव घेत गावाला आगीपासून वाचविले. ही घटना तालुक्यातील जाम येथे मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
जाम गावाच्या मागच्या बाजुस मोठ्या प्रमाणात पडिक जमिन व शेती आहे. त्या सर्व जमिनीवर वाळलेला कचरा पडलेला आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक या कचºयाने पेट घेतला. हवेमुळे या आगीचा चांगलाच भडका उडाला. ही आग झपाट्याने गावाकडे येऊ लागली. सरपंच सचिन गावंडे यांना या आगीची माहिती मिळताच त्यांनी काही ग्रामपंचायत सदस्य व युवकांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. आगीमुळे होणारे नुकसान लक्षात घेता मिळेत त्या साधनांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान हिंगणघाट येथून अग्निशमन दलाला प्राचारण करण्यात आले. तेही उशिरा पोहोचल्याने आग गावापर्यंत आली होती. पण, आगीला गावापासून दूर लोटण्यात युवक यशस्वी झाले. नंतर अग्निशमक दलानेही पाण्याचा मारा करुन आगीवर नियंत्रण मिळविले. सरपंच, सदस्य व युवकांच्या या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता पोलीस उपनिरिक्षक मिलिंद पारडकर, अरविंद येनुरकर, रवि पुरोहित, वैभव चरडे, तलाठी ढवळे, महादेव बैलमारे, प्रमोद चौखे, अक्षय फुकट, राहुल पाटील, अजय खेडेकर, मोहन सराटे यांच्यासह नागरिकांनी सहकार्य केले.