भरधाव ट्रकने दुचाकीवरील दोघांना चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:53 IST2017-11-23T00:53:30+5:302017-11-23T00:53:56+5:30

भरधाव ट्रकने दुचाकीवरील दोघांना चिरडले
ऑनलाईन लोकमत
वर्धा : नागपूरकडून सावंगी (मेघे) च्या दिशेने जाणाºया भरधाव ट्रकने दुचाकीवरील दोघांना चिरडले. हा अपघात सिंदी (मेघे) भागातील शांतीनगर चौकात बुधवारी सायंकाळी घडला. विष्णू जावळे व प्रकाश खराबे दोन्ही रा. न्यू रेल्वे कॉलनी, असे मृतकांची नावे आहे.
प्राप्त माहितीनुसार, नागपूरकडून सावंगी (मेघे)कडे जाणाºया सीजी १० आर ५३७९ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने एमएच २७ एजी ५६१७ क्रमांकाच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात दुकाचीवरील विष्णू जावळे व त्याचा सहकारी घटनास्थळीच ठार झाला. अपघात होताच ट्रक चालकाने ताब्यातील वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. दरम्यान, काही सुजान नागरिकांनी पाठलाग करून ट्रक नागठाणा चौकात अडविला. यावेळी संधी साधून ट्रक चालक अस्लम अन्सारी रा. बंगाल हा पसार झाला; पण नागरिकांनी ट्रकचा क्लिनर इमाम अन्सारी रा. झारखंड याला ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले. माहिती मिळताच रामनगर पोलीस ठाण्याची चमू घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह व अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेत पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी दोन्ही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले असून चालकाचा शोध सुरू आहे.
दीड किमीपर्यंत दुचाकी नेली फरपटत
अपघात होताच ट्रक चालकाने घटनास्थळावरून वाहनासह पळ काढला; पण दुचाकी ट्रकच्या समोरील भागात अडकली होती. ती दुचाकी घटनास्थळापासून दीड किमी अंतर नागठाणा चौकापर्यंत आरोपी ट्रक चालकाने फरपटत नेली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. पोलिसांनीही लगेच धाव घेत परिस्थिती हाताळली.