१,०४९ गावांची पैसेवारी ५० च्या आत : १० सदस्यांचे पथक येणार वर्धेत वर्धा : जिल्ह्यात यंदाच्या खरिपात काढण्यात आलेल्या नजर अंदाज पैसेवारीत १ हजार ४९ गावांची पैसेवारी ५० च्या आत आली. यामुळे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्याकरिता केंद्रीय कृषी मंत्रालयाचे पथक येणार आहे. पथक जिल्ह्यातील परिस्थितीची पाहणी करून व त्याची माहिती घेवून अहवाल वरिष्ठांकडे सादर करणार आहे. विदर्भातील दुष्काळी परिस्थिती निवारण्याकरिता राज्याने केंद्राला मदतीची मागणी केल्याने १० सदस्यांचे दोन पथक विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहेत.विदर्भातील दुष्काळी परिस्थिती व शेतकरी आत्महत्या बघता केंद्रीय कृषी मंत्रालयाचे पथक पाहणी करण्याकरिता १६ डिसेंबर रोजी वर्धेत येणार आहे. यवतमाळ जिल्ह्याचा दौरा करून ते दुपारी १२ वाजता वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे येणार आहे. केंद्रीय कृषी विभागाचे हे पथक पूर्व व पश्चिम विदर्भातील ११ जिल्ह्यात पाहणी करणार आहे. यात पाहणीच्यावेळी पथकातील अधिकारी शेतकऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडून जिल्ह्याच स्थितीची माहिती घेणार आहे. पाहणीनंतर सदर पथक नागपूर येथे जावून मुख्यमंत्री व ग्राम विकास मंत्र्याशी भेट घेत चर्चा करणार आहेत. यावेळी सर्वच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यानंतर सदर पथक दिल्लीला रवाना होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.(प्रतिनिधी)
केंद्रीय पथकाद्वारे दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
By admin | Updated: December 13, 2014 22:43 IST