दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : प्राकृतिक जीवन पध्दती आणि ग्रामीण भागात जे उपलब्ध आहे त्यांचाच वापर करण्यावर गांधीजींचा अधिक भर होता. यातूनच रोजगार आणि स्वावलंबी जीवन पध्दती निर्माण होणार होती, याची जाणीव बापूंना होती. यासाठी म्हणून त्यांनी आश्रमात शिंदोल्यांच्या पानोळ्यापासून चटया, आसन, झापड्या आणि फडे तयार करण्याच्या कामाला प्राधान्य आणि प्रोत्साहन दिले होते. पण, काळाच्या ओघात शिंदोल्यांचे झाडे दुर्मिळ झाली. कारागीरही मिळणे कठीण झाल्याने आता जिल्ह्यात चटया आणि झापड्यांची समस्या व अडचण निर्माण होऊन ज्या आहेत त्या सांभाळून ठेवण्याची कसरत आश्रम व्यवस्थापकांना करावी लागत आहे.सेवाग्राममध्ये प्रारंभी मोठ्या प्रमाणावर शिंदोल्याची झाडे आणि शिंदोल्याचे बण होते. यात चव्हाण परिवाराचे शिंदोल्यांच्या बण प्रसिद्ध होते. गावात फडे आणि झांज्या बणविण्याची पध्दती होती. सेवाग्राममध्ये मातीच्या भिंती घालून विविध कुट्यांची निर्मिती करण्यात आली.त्यामुळे आश्रमात सर्व प्रकारच्या चटया, फडे आणि कुट्यांना झांज्यांची आवश्यकता पडायला लागली. पावसाच्या पाण्यापासून मातींच्या भिंती संरक्षण करण्याकरिता घरांच्या भिंतींना झांज्या बांधण्यांची तशी जुनीच पद्धत आहे. गांधीजींनी सुध्दा यांच्या उपयोगावर विशेष भर दिल्याने मागणी वाढली. एवढेच नाही तर या झाडांपासून निरा काढण्याचे आणि गुळ बणविण्याचे काम सुरू करण्यात आले. कारागीरांना काम मिळायला लागल्याने रोजगार निर्माण झाला. कालांतराने तो वाढतही गेला. यातून नवीन कारागीर तयार होऊन ग्रामोद्योगाला चालणा मिळाली. आश्रमात झोपणे, भोजन करणे व बसणे या करीता पानोळ्यांपासून चटया व आसने तयार करण्यात येऊ लागले.त्याच्याच दैनंदिन जीवनातही वापर होऊ लागला. आजही आदी निवास व बा कुटीत प्रत्येकी एक तर बापू कुटीत चार चटया दिसून येतात. आश्रमात येणारे कार्यकर्ते असो, विदेशी पाहूने किंवा राष्ट्रीय नेते, सर्व याच चटयावर बसतात.रसोड्यात याच चटयांवर बसून जेवनही करतात. त्यामुळे आता सध्या शिंदोल्यांच्या झाडांच्या दुर्मिळतेमुळे या वस्तुंचे स्मारकापुरतेच महत्त्व राहिलेले असून त्याची जपणूक केली जात आहे.बाहेर जिल्ह्यातून आयातजिल्हातच शिंदोल्याचे झाडे दुर्मिळ झाली आहे. त्याच सोबत चटया बनविणारे कारागिरही मिळणे कठीण झाल्याने भंडारा जिल्हातील तुमसर येथून चटया बनवून आणाव्या लागत आहे. गेल्या एप्रिल महिन्यात तुमसर येथून विविध आकाराच्या १८ चटया बणवून आणण्यात आल्या. यासाठी हिराभाई यांचे सहकार्य मिळाले. यापैकी सहा चटया आश्रमातील स्मारकात टाकण्यात आली. तर उर्वरीत चटया सुरक्षित ठेवण्यात आल्या आहे.आश्रमातील कुटींच्या भिंतींचे संरक्षण करण्यासह नित्य वापराकरिता चटया व झांजीची आवश्यकता आहे. परंतु शिंदोल्यांची झाडे संपल्याने मोठी अडचण निर्माण झाली. त्यामुळे आश्रमाच्या शेतात शिंदोल्यांची झाडे लावण्याची बाब विचाराधिन आहेत.टी.आर.एन.प्रभू, अध्यक्ष, आश्रम प्रतिष्ठान,सेवाग्रामसेवाग्राम परिसरातूनच शिंदोल्याची झाडे हद्दपार झाल्यामुळे येत्या काही दिवसात अडचणी वाढणार आहे. आश्रमातील कुट्यांची सुरक्षा कशी करावी असाही प्रश्न निर्माण होणार असल्याने आवश्यक ती उपाययोजना करणे गरजेचे आहे.विजय धुमाळे, व्यवस्थापक, मकान विभाग सेवाग्राम
शिंदोल्यांचे झाड दुर्मिळ; चटया, झापड्यांची अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 6:00 AM
सेवाग्राममध्ये प्रारंभी मोठ्या प्रमाणावर शिंदोल्याची झाडे आणि शिंदोल्याचे बण होते. यात चव्हाण परिवाराचे शिंदोल्यांच्या बण प्रसिद्ध होते. गावात फडे आणि झांज्या बणविण्याची पध्दती होती. सेवाग्राममध्ये मातीच्या भिंती घालून विविध कुट्यांची निर्मिती करण्यात आली.
ठळक मुद्देकारागिरांचीही वानवा : आश्रमातील स्मारकाएवढेच राहिले महत्त्व, उपाययोजना करण्याची गरज