दारू विकणाऱ्या व पिणाऱ्यास रहिवासी दाखला नाही
By admin | Published: August 24, 2014 12:09 AM2014-08-24T00:09:38+5:302014-08-24T00:09:38+5:30
वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असताना मुबलक प्रमाणात पाहिजे त्या ठिकाणी दारू मिळते. तळेगावात तर गत काही वर्षांपासून ठिकठिकाणी दारूचे गुत्थे आहेत. त्यातही पोलिसांचा आशीर्वाद
तळेगाव (टालाटुले) : वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असताना मुबलक प्रमाणात पाहिजे त्या ठिकाणी दारू मिळते. तळेगावात तर गत काही वर्षांपासून ठिकठिकाणी दारूचे गुत्थे आहेत. त्यातही पोलिसांचा आशीर्वाद असल्याने दारूविक्रेते अधिकच निर्ढावले आहेत. यामुळे आता दारूबंदीकरिता ग्रामस्थांनी कंबर कसली आहे. यामुळे सध्या गावात शांतता असून जर कुणी दारू विक्री करताना वा पिऊन दिसला तर त्याला रहिवासी दाखल देण्यात दिल्या जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे.
गावात मिळत असलेल्या दारूमुळे गावात अनेक वेळा तंटे झाल्याचे समोर आले आहे. काही महिन्यांपूर्वी तर माजी सरपंचालाही जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे माजी सरपंचाने कारवाई पोटी दारूबंदीकरिता पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले होते. दारूमुळे अनेक कुटुंब उघडयावर आले आहे. यासाठी पहिल्यांदा ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी सर्व पक्षीय सभा घेत गावात १४ आॅगस्टपासून दारूबंदीची घोषणा केली. गावभर जनजागृती करण्याकरिता पोस्टर लावले. त्यात दारूसोडा अन्यथा गाव सोडा असा संदेश दिला आहे. दोन महिन्यांपूर्वी दारूबंदी सहमत असहमत सर्वेक्षण चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये चार हजार महिलांनी नोंदणी करून घेतली.
यानंतर ग्रामपंचायतमध्ये दारूविक्रेत्याची बैठक बोलावून त्यांनी शिल्लक असलेल्या माल विकण्याची परवानगी मागितली. ग्रामपंचायतीने १३ आॅगस्ट पर्यंत विका नंतर १४ आॅगस्टपासून बंदीची मोहीम आहे, असे सांगितले. दारूविक्रेत्यांनीही ते मान्य केले. ठाणेदार विजय मगर यांनी गावकऱ्यांने स्वत: कायदा हातात न घेता दारूविक्री करताना कोणी आढल्यास व पिऊन दिसल्यास माहिती द्या, मी लगेच पोलिसांना घेवून पोहचेल. शिवाय त्यांनी भ्रमनध्वनीही सभेमध्ये दिला. दारूविक्री करणाऱ्याला तीन महिने जमानत नाही व कलम ३२८ नुसार गुन्हा व पिणाऱ्यास कलम ८५ दाखल करणार, असे सांगितले. सरपंच अतुल तिमांडे यांनी गावात शांतता नांदावी यासाठी दारूबंदी बाबत गावकऱ्यांना सहकार्य करण्याची गरज व्यक्त केली. गावात दारूबंदीची मोहीम राबविण्यात येत असल्याने गावात सध्या शांतता दिसत आहे. यानिमित्त ग्रामपंचायत सचिवालयात पार पडलेल्या अल्लीपूरचे नवीन ठाणेदार मगर, जि.प. सदस्य मिलिंद भेंडे, सरपंच अतुल तिमांडे उपस्थित होते.(वार्ताहर)