जिल्ह्यात सिकलसेलच्या ९०१ रुग्णांची नोंद
By Admin | Updated: June 21, 2017 00:50 IST2017-06-21T00:50:10+5:302017-06-21T00:50:10+5:30
महाराष्ट्र राज्यात सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम २००८ पासून सुरू झाला आहे.

जिल्ह्यात सिकलसेलच्या ९०१ रुग्णांची नोंद
राज गहलोत : वाहकांची संख्या तब्बल ११ हजार ८२१
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाराष्ट्र राज्यात सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम २००८ पासून सुरू झाला आहे. वर्धा जिल्ह्यात सिकलसेलचे ९०१ रुग्ण आणि ११ हजार ८२१ वाहक आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. सिकलसेल वाहकाने निरोगी व्यक्तीशी विवाह केल्यास येणारे अपत्य निरोगी जन्माला येण्याची शक्यता अधिक असते. यासाठी लग्नापूर्वी उपवर मुला-मुलींच्या रक्ताची तपासणी व समाजात याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे, असे मत डॉ. राज गहलोत यांनी व्यक्त केले.
१९ जून रोजी जागतिक सिकलसेल दिनाचा कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोग्य विभाग व नामदेव महाराज बहुउद्देशीय शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. कार्यक्रमाला अतिथी म्हणून निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क विभाग) डॉ. विनोद वाघमारे, वैद्यकीय अधिकारी जिल्हा प्रशिक्षण पथक डॉ. मंगेश रेवतकर, डॉ. आंबेडकर कॉलेज आॅफ सोशल वर्कचे प्राचार्या डॉ. आनंदप्रकाश भेले, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अनुजा बारापात्रे, मेट्रन पुनसे, आशा नगराळे आदी उपस्थित होते.
सिकलसेल आजार हा आदिवासी भागात अधिक प्रमाणत आढळून येतो; पण जिल्ह्याची सिकलसेल रुगणांची संख्या पाहिल्यास या आजाराची गंभिरता लक्षात येते. पुढील पिढीला या आजारापासून वाचविण्याकरिता गर्भवती मातेने पहिल्या तीमाहित गर्भजल चाचणी परीक्षण करणे महत्त्वाचे आहे. याद्वारे बाळाला हा आजार आहे वा नाही, हे कळू शकते. योग्य औषधोपचाराने सिकलसेल रुग्णही साधारण व्यक्तीप्रमाणे आयुष्य जगू शकतो, असे डॉ. वाघमारे यांनी सांगितले. डॉ. रेवतकर यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. भेले यांनी आरोग्य विभाग व समाजकार्य विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तळागाळातील व्यक्तींचे समूपदेशन करून जागृती करण्याकरिता सहकार्य करावे, असे आवाहन केले.
शंकर तायडे यांनी रुग्णांना चांगले व दीर्घायुष्य जगण्याकरिता योगाचे महत्त्व काय, याबाबत माहिती दिली. नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनींनी पथनाट्य सादरीकरणातून संदेश दिला.
संचालन सिकलसेल समुपदेशक देवांगण वाघमारे यांनी केले. प्रास्ताविक करीत आभार अन्नपूर्ण ढोबळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रशांत कठाणे, अंकुश कांचणपुरे, प्रभाकर पाटील, जयश्री, जयमाला, हर्षद ढोबळे, राहुल बुचुंडे यांच्यासह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.