लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येथील रेल्वेस्थानकावर थांबविण्यात आलेल्या गाड्यांचे थांबे त्वरित पूर्ववत करावेत, तसेच नवीन गाड्या सुरू कराव्यात, या मागणीसाठी वर्धा-बल्लारशाह यात्री संघाने १४ जून रोजी खासदार अमर काळे यांची नंदोरी चौक येथे भेट घेऊन निवेदन दिले. हिंगणघाट हे सुमारे २ लाख लोकसंख्येचे मोठे औद्योगिक शहर असून, थांब्यांच्या अभावी येथील नागरिक आणि हजारो प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कोरोना काळात थांबविण्यात आलेल्या अनेक रेल्वेथांब्यांच्या सुविधा अद्यापही पूर्ववत झालेल्या नाहीत. यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून, काम, शिक्षण तसेच इतर गरजांसाठी ये जा करताना अनेक अडचणी येत असल्याचे यात्री संघाने म्हटले आहे.
अधिकाऱ्यांशी चर्चेचे दिले आश्वासनखासदार अमर काळे यांनी यात्री संघाच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि या निवेदनाची दखल घेऊन योग्य कारवाई करण्याबरोबरच रेल्वेमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी वर्धा-बल्लारशाह यात्री संघाचे संघटक राजेश कोचर, अध्यक्ष दिलीप बालपांडे, डी. के. गुरनुले, माजी नगरसेवक मनीष देवढे, सतीश धोबे आदी उपस्थित होते.
या गाड्यांचा आहे समावेशवर्धा-बल्लारशाह यात्री संघाने भगत की कोठी-चेन्नई सेंट्रल, कोरबा- तिरुअनंतपुरम, इंदौर-तिरुवनंतपुरम, रायपूर-सिकंदराबाद, जोधपूर-चेन्नई सेंट्रल, जयपूर-कोइम्बतूर, म्हैसूर-जयपूर, हिसार-सिकंदराबाद, कोल्हापूर-धनबाद, ओखा-पुरी (द्वारका एक्सप्रेस), गोरखपूर-सिकंदराबाद, रायपूर-सिकंदराबाद, विशाखापट्टनम-गांधीधाम, नवी दिल्ली-तिरुअनंतपुरम, दानापूर-बेंगळुरू (संघमित्रा एक्सप्रेस) आणि नागपूर-सिकंदराबाद (वंदे भारत एक्सप्रेस) यासह इतर अनेक गाड्यांना थांबे देण्याची मागणी केली आहे. याव्यतिरिक्त, काजीपेठ-पुणे व बल्लारशाह-मुंबई एक्सप्रेस दररोज सुरू करणे, दैनंदिन प्रवासासाठी अत्यंत आवश्यक असलेली काझीपेठ-अजनी पॅसेंजर ट्रेन त्वरित सुरू करणे आणि भुसावळ-वर्धा पॅसेंजरला बल्लारशाहपर्यंत वाढवावी.