माकडांचा उच्छाद; शेतकरी हैराण
By Admin | Updated: February 12, 2016 02:31 IST2016-02-12T02:31:28+5:302016-02-12T02:31:28+5:30
माकडांचे कळप सध्या शेती, गाव व शहरांकडे वळले आहेत. यामुळे शेतकरी, नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे.

माकडांचा उच्छाद; शेतकरी हैराण
घरांवरील कौलांचे नुकसान : शहरांमध्येही धुमाकूळ, अपघाताची शक्यता
वर्धा : माकडांचे कळप सध्या शेती, गाव व शहरांकडे वळले आहेत. यामुळे शेतकरी, नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. शहरांमध्येही माकडांचे कळप दिसून येत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे शेतकरी, नागरिक त्रस्त झाले आहेत. या माकडांच्या बंदोबस्ताची मागणी होत आहे.
सध्या शेतांमध्ये चना, वटाणा, गहू यासह अन्य पिकेही मळणी, सवंगणीवर आली आहेत. यामुळे माकडांनी आपला मोर्चा शेतांमध्ये वळविल्याचे दिसून येते. पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी माकडांना शेतातून पिटाळून लावतात. परिणामी, माकडांनी आपला मोर्चा गाव व शहरांकडे वळविला आहे. यामुळे गावातील माकडांचा उच्छाद वाढल्याचे दिसून येत आहे. शेतांलगत सर्वच गावांमध्ये माकडांचा धुमाकूळ दिसून येतो. या घरावरून त्या घरावर उड्या मारताना कवेलू फुटत असल्याने ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शिवाय शहरांमध्ये कवेलूचे नुकसान होत नसले तरी महिलांमध्ये माकडांची दहशत दिसून येते. परिणामी, छतावर टाकलेले वाळवण व कपडे वाळत घालण्याचीही महिलांना सोय राहिली नाही. वन विभागाने माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
तळेगावात धान्य व वाळवणावर मर्कटांचा डल्ला
तळेगाव (श्या.पंत.) : नेहमी संकटांचा सामना करणाऱ्या नागरिकांवर आता वेगळेच संकट ओढवले आहे. गावभर हैदोस घालणाऱ्या माकडांमुळे नागरिकांचा जीव मेटाकुटीस आला आहे. विशेषत: महिला वर्ग सर्वाधिक त्रस्त झाला आहे. घराबाहेर ठेवलेल्या धान्य आणि वाळवणावर डल्ला मारणे, हेच या माकडांचे वैशिष्ट्य ठरले आहे.
गत १५ दिवसांपासून या प्रकाराने तळेगाव व परिसरातील गावात चर्चेचे वादळ उठले आहे. महिला वर्गामध्ये या माकडाबद्दल भीतीचे वातावरणही पसरले आहे. घराबाहेर ठेवलेल्या धान्यावर विशेषत: तांदूळ आणि धापोड्यावर माकडे ताव मारत आहेत. केवळ तावच मारत नाहीत तर इतर साहित्याचीही मोठ्या प्रमाणात नासधूस करताना दिसतात. माकड्यांच्या झुंडी विविध वॉर्डामध्ये फिरताना दिसतात. घरावर उड्या मारत असल्याने माकडांबाबत भीती पसरली आहे. घराबाहेर कोणतीही वस्तू ठेवणे म्हणजे ती माकडांच्या तावडीत सापडून नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे अंगणात ठेवलेले विविध प्रकाराचे साहित्य घरातच कोंबावे लागत असल्याचे दिसते. अनेकांच्या चपलाही माकडांनी चोरून नेल्याचे सांगितले जाते.
स्लॅबवरील पाण्याच्या टाकीवर उड्या मारत असून पाईपलाईनचीही नासधूस करीत आहे. अंगणातील फुलझाडे माकडांनी तोडून टाकल्याची ओरड होत आहे. कवेलूच्या घरांची तर मोठ्या प्रमाणात नासधूस होत आहे. वनविभागाने या माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून करण्यात येत आहे.(वार्ताहर)