मिनीमंत्रालयातील सभापतींचे दालन ‘लॉकडाऊन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 05:00 AM2020-04-08T05:00:00+5:302020-04-08T05:00:07+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीचा आदेश पारित करुन शासकीय कार्यालयात ५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे जिल्हा परिषदेतही प्रवेशव्दारावर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत विनाकारण येणाऱ्यांना अटकाव केला जात आहे. जिल्हा परिषदेतील सर्व सभापतींचे दालन बंद असून सर्व विभागातील कामकाज मात्र, सुरळीत सुरु आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ग्रामीण भागाच्या विकासाची धुरा सांभाळणाºया जिल्हा परिषदेत नेहमीच वर्दळ असायची. मात्र आता कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी व जमावबंदी लागू केल्याने मिनीमंत्रालयातील गजबजही कमी झाली आहे. येथील सभापतींचे दालन सध्या कुलूपबंद असल्याने त्यांच्याकडे येणाऱ्या नागरिकांसह कार्यकर्त्यांची गर्दीही ओसरली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीचा आदेश पारित करुन शासकीय कार्यालयात ५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे जिल्हा परिषदेतही प्रवेशव्दारावर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत विनाकारण येणाऱ्यांना अटकाव केला जात आहे. जिल्हा परिषदेतील सर्व सभापतींचे दालन बंद असून सर्व विभागातील कामकाज मात्र, सुरळीत सुरु आहे. विभागप्रमुखांनी तयार केलेल्या कर्मचाऱ्यांच्या यादीनुसार दररोज ५ टक्के कर्मचारी कर्तव्यावर हजर राहत आहे. तर जिल्हा परिषदेचे काही पदाधिकारी आपापल्या सर्कलमध्ये गरजू व गरिबांना सेवा देण्यासाठी तसेच सध्याच्या परिस्थिताचा आढावा घेण्यासाठी झटत आहे तर काही पदाधिकाऱ्यांचा घरीच मुक्काम असल्याचे चित्र आहे. तसेच इमारतीच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून या परिसरातील नियमित स्वच्छता केली जात आहे. तसेच प्रत्येक ठिकाणी कर्मचाºयांकडून आलेल्यांना सॅनिटायझर देऊन हात स्वच्छ करण्यास सांगितले जात आहे.
इमारतीत निघतोय सिगारेटचा धूर
शासकीय कार्यालयात किंवा सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे निषिद्ध असले तरीही जिल्हा परिषदेत नेहमीच सिगारेटचा धूर निघताना दिसतो. सध्या संचारबंदीच्या काळातील जिल्हा परिषदेच्या इमारतीत तळमजल्यावर सिगारेटचा वास घुमतोय. त्यामुळे सर्व दुकाने व पानटपºया बंद असतानाही सिगारेटचे झुरके सोडणाऱ्या सिगारेट उपलब्ध होते कशी? हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे संचारबंदीच्या काळातही चक्क जिल्हा परिषदेत सिगारेट ओढणाऱ्याचा शोध घेऊन कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.
संचारबंदीनंतरही ये-जा सुरुच
सार्वजनिक ठिकाणी किंवा शासकीय कार्यालयात होणारी गर्दी कमी करण्याकरिता संचारबंदी करण्यात आली आहे. मात्र, जिल्हा परिषदेतील काही सदस्य आपल्या सर्कलमधून जिल्हा परिषदेत येऊन गर्दी वाढवित असल्याचे दिसून येत आहे. काही सदस्य फक्त वाहनाने जिल्हा परिषदेत येतात. काही वेळ अळमटळम केल्यानंतर पुन्हा निघून जातात. तर काही सदस्य जिल्हा परिषदेत दिवसभर ठिय्या मारुन असतात. सदस्यांनी सध्याच्या गंभीर परिस्थितीचा विचार करुन जिल्हा परिषदेत गर्दी टाळण्यासाठी संचार थांबवावा. आपल्या सर्कलमध्ये राहूनच काही महत्वाचे कामे असतील तर ती भ्रमणध्वनीवरुन पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.