विहिरीत पडलेल्या चितळाला जीवदान
By Admin | Updated: April 20, 2016 02:20 IST2016-04-20T02:20:59+5:302016-04-20T02:20:59+5:30
वाढत्या उन्हामुळे जंगलातील पाणवठे आटत आहेत. यामुळे वन्यप्राणी पाण्यासाठी गावाकडे धाव घेत आहे.

विहिरीत पडलेल्या चितळाला जीवदान
पिपल फॉर अॅनिमल्स व वनविभागाकडून संयुक्त प्रयत्न
वर्धा : वाढत्या उन्हामुळे जंगलातील पाणवठे आटत आहेत. यामुळे वन्यप्राणी पाण्यासाठी गावाकडे धाव घेत आहे. यातच आर्वी तालुक्यातील दहेगाव (मुस्तफा) येथील एका शेतातील विहिरीत चितळ पडल्याची माहिती ग्रामस्थांनी येथील पिपल फॉर अॅनिमल्सला दिली. त्यांनी वन विभागाच्या साह्याने ते चितळ बाहेर काढून त्याला जीवनदान दिले.
पाण्याच्या शोधात गावाकडे आलेले चितळ विहिरीत पडल्याची माहिती नागरिकांनी येथील पिपल फॉर अॅनिमल्सच्या मनीष ठाकरे यांना दिली. ठाकरे यांनी त्वरित वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना संपर्क केला व घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले; पण चितळाचे वजन ८० ते ९० किलो असल्याने त्याला विहिरीतून बाहेर काढणे सहज शक्य नव्हते. अखेर वर्धेवरून मदत मागवून या चितळाला बाहेर काढण्यात आले. यासाठी पिपल फॉर अॅनिमल्सचे वर्धा येथील कौस्तुभ गावंडे, सूरज सिंग यांच्यासह आर्वी वन विभागाचे क्षेत्र सहाय्यक बनसोड, बिट गार्ड इंगळे, तांबेकर, तंबाके, पिपल फॉर अॅनिमल्सचे उमेश धुमडे, प्रमोद उदासे, मंगेश येनोरकर व दहेगाव (मुस्ताफा) येथील ग्रामस्थांनीही चितळाला विहिरीतून बाहेर काढण्यास मोठी मदत केली.
चितळाला बाहेर काढल्यानंतर त्याला काही गंभीर जखमा झाल्याचे दिसून आले. यामुळे त्याला औषधोपचाराकरिता वर्धेतील करुणाश्रमात आणण्यात आले. तेथे पिपल फॉर अॅनिमल्सचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप जोगे चितळावर उपचार करीत आहे. सचिव आशिष गोस्वामी यांच्या मार्गदर्शनात मुकेश नेहारे व गणेश मसराम चितळाची विशेष काळजी घेत आहे. वन विभागाच्या आदेशानंतर चितळाला जंगलात सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.(कार्यालय प्रतिनिधी)