कान्होलीला यशोदाच्या पुराचा वेढा, ४० पैकी १५ कुटुंबांना केले रेस्कू, २५ व्यक्तींची चमू युद्धपातळीवर करतेय बचाव कार्य

By महेश सायखेडे | Updated: August 9, 2022 19:20 IST2022-08-09T19:20:00+5:302022-08-09T19:20:38+5:30

Flood in Kanholi: हिंगणघाट तालुक्यातील कान्होली गावाला यशोदा नदीच्या पुराने वेढल्याने या गावाचा संपर्कच तुटला आहे. ही माहिती मिळताच हिंगणघाट तालुका प्रशासन तसेच पोलीस मुख्यालयातील बचाव पथकाच्या २५ व्यक्तींचे सहकार्य घेत बचाव मोहीम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे.

Kanholi surrounded by Yashoda flood, 15 out of 40 families rescued, 25-person team on war footing | कान्होलीला यशोदाच्या पुराचा वेढा, ४० पैकी १५ कुटुंबांना केले रेस्कू, २५ व्यक्तींची चमू युद्धपातळीवर करतेय बचाव कार्य

कान्होलीला यशोदाच्या पुराचा वेढा, ४० पैकी १५ कुटुंबांना केले रेस्कू, २५ व्यक्तींची चमू युद्धपातळीवर करतेय बचाव कार्य

- महेश सायखेडे 
वर्धा : हिंगणघाट तालुक्यातील कान्होली गावाला यशोदा नदीच्या पुराने वेढल्याने या गावाचा संपर्कच तुटला आहे. ही माहिती मिळताच हिंगणघाट तालुका प्रशासन तसेच पोलीस मुख्यालयातील बचाव पथकाच्या २५ व्यक्तींचे सहकार्य घेत बचाव मोहीम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. रात्री ७ वाजेपर्यंत ४० पैकी १५ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून उर्वरित कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरू होते. सततच्या पावसामुळे यशोदा नदीच्या पाणी पातळीत कमालीचीच वाढ झाली. इतकेच नव्हे तर नदी ओसंडून वाहत असल्याने कान्होली या गावाचा संपर्कच तुटला आहे. नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने थेट बचाव कार्यालाच सुरूवात करण्यात आली आहे. या रेस्कू मोहिमेवर हिंगणघाटचे तहसीलदार सतीश मसाळ यांचे लक्ष असून ते जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात आले.बॉक्स

५ मुलांसह १६ महिला अन् ३० पुरुष सुरक्षित रेस्कू
बचाव मोहीम सध्या युद्धपातळीवर राबविली जात असून रात्री ७ वाजेपर्यंत १५ कुटुंबातील एकूण ५१ व्यक्तींना सुरक्षित रेस्कू करण्यात आले आहे. यात पाच मुलांसह १६ महिला व ३० पुरुषांचा समावेश आहे. एका रबरी बोटच्या जोरावर ही मोहीम राबविली जात असून रेस्कू केलेल्यांना नवीन कान्होली पूनर्वसन येथील ग्रामपंचायत तसेच मंदीराच्या इमारतीत ठेवण्यात आले आहे.

 पुराच्या वेढ्यामुळे २०० व्यक्ती अडकल्याचा अंदाज
नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने सुरक्षित ठिकाणी जावे असा सल्ला तालुका प्रशासनाच्या वतीने कान्होली येथील नागरिकांना देण्यात आला. त्याला प्रतिसाद देत काहींनी वेळीच तालुका प्रशासनाने सुचविलेले सुरक्षित ठिकाण गाठले. पण अवघ्या काही वेळातच पुराने गावाला वेढल्याने सुमारे १५० ते २०० व्यक्ती कान्होलीतच अडकले. याच व्यक्तींना सध्या रेस्कू केले जात असल्याचे हिंगणघाटचे तहसीलदार सतीश मसाळ यांनी सांगितले.

Web Title: Kanholi surrounded by Yashoda flood, 15 out of 40 families rescued, 25-person team on war footing