सेवाग्राम : विदर्भातील शेतकरी हा निसर्ग आणि शासनाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. शासनाने मदतीचे आश्वासने दिली मात्र पूर्ण केली नाही. राज्य शासनाचे शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी किसान अधिकार अभियानने मुख्यमंत्र्यांच्या घरी पाहुणचार आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारला सेवाग्राम, बापू कुटीपासून पदयात्रा काढून आंदोलनला प्रारंभ करण्यात आले.या आंदोलनात वर्धा, चंद्रपूर, वाशिम, वणी, यवतमाळ व नागपूर जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले आहे. ही पदयात्रा १५ डिसेंबरला दुपारला नागपूर येथे पोहचणार आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर मागण्या पूर्ण होईपर्यंत मुक्काम करणार आहे.सेवाग्राम महात्मा गांधी आश्रमात सर्व शेतकरी एकत्रित झाल्यानंतर किसान अधिकार अभियानचे प्रवक्ते अविनाश काकडे यांनी उपस्थितांना संबोधित केले. शेतकरी दुष्काळाच्या वेढ्यात सापडला आहे. शासनाने शेतकऱ्यांना या स्थितीत भरीव मदत करावी, अशी अपेक्षा आहे. सोयाबीन व कापसाला जो हमी भाव जाहीर झाला होता. त्यापेक्षा जास्त भावात खरेदी करावा, तसेच सोयाबीन पूर्णत: बुडाल्याने २५ हजार रूपये हेक्टरी मदत करावी. कृषी संजीवनी योजनेचा लाभ, सातबारा कोरा करणे तसेच वर्धा, नागपूर व बुलढाणा या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या रकमा परतीसाठी मदत करावी, या मागण्याच्या समावेश आहे. यासह प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावावे, अशी मागणी या पायदळ आंदोलनातून करण्यात येणार आहे. यावेळी चंद्रकांत वानखेडे यांनी शासनाने सतत शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम केले आहे. आता मात्र या आंदोलनातून सरकारला जागविण्याचे काम करण्यात येणार असल्याचे सांगितले. सर्व आंदोलकांनी बापू कुटीत महात्मा गांधी यांना आदरांजली वाहून पदयात्रेला प्रारंभ केला. यानंतर मेडिकल चौकात सेवाग्राम ग्रामपंचायतच्यावतीने पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व चंद्रकांत वानखेडे, गजानन अहमदाबादकर, अविनाश काकडे, सुदाम पवार करणार आहे. यात प्रमोद ठाकरे, मंदा ठाकरे, हरिभाऊ डुकरे, विठ्ठल झाडे, भाऊराव काकडे, विनायक गोमासे, संतोष सावकर, माधुरी भोगे, सुनिता अडतकर, बेबी हिवरे, सुजाता उमरे, दिवाकर होणाडे, शेखर गुजरकर, प्रफुल कुकडे, गजानन वाकुडकर, आदी शेतकरी मोठ्या संख्येनी सहभागी आहेत.(वार्ताहर)
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पदयात्रा
By admin | Updated: December 13, 2014 02:09 IST