वर्धा : शहराला पाणीपुरवठा करणारी योजना सदोष असल्याने निम्मे पाणी वाया जात आहे. एक दिवसाआड पाणी पुरवठा होत असतानाही सुमारे आठ लाख लिटर पाणी शहरातील नाल्यांतून वाहत आहे. याचा फटका पालिकेला बसत असल्याने पाणीपुरवठा योजना पालिकेकरिता नुकसानीची ठरत आहे.वर्धेला पाणी पुरवठा करण्याकरिता पवनार व येळाकेळी येथून पाणी घेतल्या जाते. येळाकेळी येथे १७ तर पवनार येथून १२ एमएलडी (मिलियन लिटर पर डे) पाणी पुरविण्याची ताकद आहे. शहराला दिवसाआड १६ एमएलडी पाण्याची गरज भासते. तेवढे पाणी या दोनही केंद्रातून घेतले जात असून यातील निम्मे पाणी वाया जात आहे. याला केवळ पालिकेची सदोष पाणीपुरवठा योजना कारण असल्याचे समोर आले आहे.शहरात पालिकेच्या एकूण १४ हजार नळ जोडण्या असल्याची नोंद आहे. ३७० सार्वजनिक नळ आहेत. या नळांना पाणी पुरविण्याकरिता असलेली नळ योजना कुचकामी ठरत आहे. पाणी मुबलक असताना केवळ नळाला दाब येत नसल्याने वेळेपेक्षा अधिक काळ नळ सुरू असतात. यामुळे पाण्याचा अपव्य होत आहे. एकाच लाईनमध्ये असलेले नळ सुमारे तीन ते चार तास सुरू ठेवावे लागतात. एका घरी पाणी भरण्याकरिता साधारणत: अर्धा तासाचा कालावधी पुरेसा आहे; मात्र या अर्ध्या तासाकरिता नळ तीन ते चार तास सुरू राहत असल्याने पाण्याचा अपव्यय आहे. पालिकेच्यावतीने एका अर्धा इंची नळाकरिता वर्षाकाठी सरासरी १ हजार ५०० रुपयांचे देयक आकारण्यात येत आहे. पाण्याच्या अपव्ययामुळे पालिकेला अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत आहे.(प्रतिनिधी)
निम्मे पाणी वाहते नाल्यांत
By admin | Published: January 25, 2015 11:19 PM