पऱ्हाटीची वाढ झाली; पण पाती, बोंड नाममात्रच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 06:00 AM2019-10-23T06:00:00+5:302019-10-23T06:00:14+5:30
या भागातील कपाशीच्या झाडांची वाढ उत्तमरीत्या झाली असली तरी पाती आणि बोंडे खुपच अल्प प्रमाणात झाडावर असल्यामुळे यंदा कपाशीच्या उत्पन्नात चांगलीच घट येण्याची शक्यता वयोवृद्ध शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. यंदा सुरूवातील पावसाने दांडी मारली होती. परंतु, त्यानंतर वेळोवेळी झालेल्या मुसळधार पावसाने या भागातील शेतकऱ्यांना सळो की पळो करूनच सोडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : सतत थांबुन-थांबुन होणाऱ्या मुसळधार पावसामुळे या भागातील शेतकरी चांगलाच मेटाकुटीस आला. परंतु, त्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्याने व पिकाची योग्य निगा राखल्याने कपाशीच्या पिकाची वाढ बऱ्यापैकी झाली. परंतु, सध्या बऱ्यापैकी वाढ झालेल्या पऱ्हाटीला पाहिजे त्या प्रमाणात पाती अन् बोंड लागली नसल्याने या भागातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी या परिसरातील शेतपिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य सल्ला देणे गरजेचे आहे. पण अधिकाऱ्यांकडून उंटावरून शेळा हाकलण्याचा प्रकार होत असल्याची ओरड या भागातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
या भागातील कपाशीच्या झाडांची वाढ उत्तमरीत्या झाली असली तरी पाती आणि बोंडे खुपच अल्प प्रमाणात झाडावर असल्यामुळे यंदा कपाशीच्या उत्पन्नात चांगलीच घट येण्याची शक्यता वयोवृद्ध शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. यंदा सुरूवातील पावसाने दांडी मारली होती. परंतु, त्यानंतर वेळोवेळी झालेल्या मुसळधार पावसाने या भागातील शेतकऱ्यांना सळो की पळो करूनच सोडले. सतत पाऊस कायम राहिल्याने शेतीची अनेक कामे खोळंबली होती. अशातच अनेक शेतशिवारांना पावसाच्या पाण्यामुळे तळ्याचे स्वरूप आले होते.
मात्र, मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. शिवाय पिकाची वाढ बºयापैकी झाली. असे असले तरी सध्या एका कपाशीच्या झाडाला १० ते १५ इतकीच बोंड असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या भागातील कपाशी पिकाची पाहणी करून कपाशी उत्पादकांना वेळीच योग्य मार्गदर्शन करावे, अशी मागणी या भागातील शेतकºयांची आहे.
सोयाबीनचा उतारा घटल्याने शेतकरी हवालदिल
यंदाच्या वर्षी सध्या सोयाबीनच्या उताऱ्यात बऱ्यापैकी घट येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. पूर्वीच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असून त्यातच उत्पादनात घट येत असल्याने या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच बाजापेठेत भावही कमी आहे.