पेरणी ते कापणीचा खर्च शासनाने द्यावा
By Admin | Updated: August 18, 2015 02:23 IST2015-08-18T02:23:48+5:302015-08-18T02:23:48+5:30
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शासनाच्या शेतकरी एपीएल योजनेचा तालुक्यात शुभारंभ करण्यात आला.

पेरणी ते कापणीचा खर्च शासनाने द्यावा
देवळी : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शासनाच्या शेतकरी एपीएल योजनेचा तालुक्यात शुभारंभ करण्यात आला. तालुक्यातील देवळी, नाचणगाव, अडेगाव व घोडेगाव या चार ठिकाणी योजनेची सुरुवात करून सातबाराधारक लाभार्थ्यांना धान्याचे वाटप खासदार रामदास तडस यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवाई, तहसीलदार तेजस्विनी जाधव, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी चव्हाण यांचे उपस्थितीत ही योजना कार्यान्वीत करण्यात आली.
शेतकऱ्यांची हलाखीची परिस्थिती लक्षात घेता शेतमालाच्या पेरणीपासून ते कापणीपर्यंतचा सर्व खर्च सरकारने द्यावा. रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर ही बाब कार्यान्वीत करून दिलासा द्यावा, अशी मागणी खा. तडस यांनी याप्रसंगी केली.
या योजनेची सुरुवात देवळी येथून केली. येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी येथे आयोजित कार्यक्रमात शांता आंबटकर, वामन कामडी, लक्ष्मण फटिंग, छबु महाजन, मारोतराव झाडे आदी शेतकरी लाभार्थ्यांना अतिथींच्या हस्ते धान्याचे वाटप करण्यात आले. प्रती व्यक्ती पाच किलो याप्रमाणे तालुक्यातील नऊ हजार कुटुंबीयांना गहु व तांदुळ यांचे वाटप करण्याचे उद्दीष्ट ठरविण्यात आले.
संपूर्ण शेती निसर्गावर अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्यांची दैनावस्था झाली आहे. जिल्ह्यातील लोअर वर्धा, आजनसरा, पोथरा आदी प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यापर्यंत पोहचत नाही. आजपर्यंत झालेला विकास नावापुरता ठरला आहे. त्यामुळे पंतप्रधान सिंचन योजनेपर्यंत न्यायाची भूमिका घेण्यात येणार आहे. सातबारा धान्य वाटप योजनेतून कोणताही शेतकरी शेतमजूर सुटणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना तडस यांनी दिल्या. या योजनेतून तालुक्यातील कोणताही अधिकारी सुटणार नाही याची दक्षता घेतली जाणार असून येत्या महिनाभर प्रशासन राबणार आहे. संबंधित समस्यांचे निराकरण करून द्यावे, असे मत तहसीलदार जाधव यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोसायटीचे अध्यक्ष शरद आदमने व आभारप्रदर्शन सचिव जगदीश गावंडे यांनी केले. यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष मुकेश भिसे, धान्य पुरवठा समितीचे शहर अध्यक्ष विजय भोयर, सोसायटीचे संचालक संतोष मरघाडे, प्रकाश कारोटकर, शाम घोडे, सुरेश तायवाडे, विजय लाडेकर, श्रीकांत येनुरकर, संतोष भोयर, गजानन डोंगरे, तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)
हिंगणघाट तालुका
४येथील योजनेचा प्रारंभ शेकापूर (बाई) येथील देवीदास पाटील स्वस्त धान्य दुकान तर वडनेर येथे बाजार चौकातील आयोजित कार्यक्रमात आ. समीर कुणावार यांचे हस्ते केला. यावेळी उपविभागीय अधिकारी घनश्याम भुगांवकर, तहसीलदार दिपक करंडे, नायब तहसीलदार अरविंद हिंगे, लोमा खोडे, गजानन टेकाडे, किशोर दिघे, प्रा. किरण वैद्य, वसंतराव आंबटकर व शेतकरी, स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते. तालुक्यातील १ लाख २३ हजार लाभार्थीना या योजनेत सवलतीच्या दरात प्रति व्यक्ती ५ किलो धान्य मिळणार आहे. यात यापुर्वी समाविष्ट नसलेल्या ६ हजार ५०७ कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यात ३१ हजार ३७२ व्यक्ती लाभार्थ्यांचा समावेश आहे.(तालुका प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना धान्य वाटपाचा शुभारंभ
नाचणगाव : एपीएल योजनेतील शेतकरी लाभार्थी अन्नधान्य वाटप योजनेचा शुभारंभ स्वातंत्र्यदिनी जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवई यांचे हस्ते करण्यात आला.
अवर्षण व अतिवृष्टीमुळे पीडित शेतकरी कुटुंबांना मदत म्हणून शासनाने या योजनेची सुरुवात केली आहे. यात प्रति व्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ असे धान्य अनुक्रमे दोन व तीन रूपये या दराने उपलब्ध करण्यात आले. या योजनेचा लाभ सर्व ७/१२ धारक शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन तहसीलदार तेजस्विनी जाधव यांनी केले. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. यावेळी कृषी व पशुसंवर्धन सभापती श्यामलता अग्रवाल, सरपंच सुनीता जुनघरे, नायब तहसीलदार सोनवने, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी चव्हाण, माजी जि.प. सदस्य दिलीप अग्रवाल, माजी सरपंच शंकर राऊत, हरीभाऊ साठे, ग्रामविकास अधिकारी अशोक बोबडे, तलाठी यु. ढोकणे व शेतकरी उपस्थित होते. संचालन व आभार प्रमोद बिरे यांनी केले.(वार्ताहर)