थंडीच्या महिन्यातही पारा ३१ अंशावरच
By Admin | Updated: November 5, 2016 00:56 IST2016-11-05T00:56:05+5:302016-11-05T00:56:05+5:30
दिवाळीच्या काळ थंडीचा म्हणून ओळखला जातो, असे असताना वर्धेत नोव्हेंबर महिना उगविला तरी पारा ३१ अंशावरच आहे.

थंडीच्या महिन्यातही पारा ३१ अंशावरच
दिवसा उकाडा रात्री थंडी : वर्धेकरांना थंडीची प्रतीक्षा
महेश सायखेडे वर्धा
दिवाळीच्या काळ थंडीचा म्हणून ओळखला जातो, असे असताना वर्धेत नोव्हेंबर महिना उगविला तरी पारा ३१ अंशावरच आहे. यामुळे दिवसा उकाडा आणि रात्रीला थोडी थंडी असे काहीचे वातावरण वर्धेंकरांना अनुभवायला येत आहे. असे असले तरी यंदा जिल्ह्यात थंडीची चांगलीच हुडहुडी भरणार असल्याचे बोलले जात आहे. याच गुलाबी थंडीच्या प्रतीक्षेत असलेल्यांनी गत आठ महिने आलमारीत ठेवले जाणारे गरम कपडे बाहेर काढले आहे.
आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात व नोव्हेंबरमध्ये अपवादात्मक तापमान ३१ अंशावर जाते. परंतु, यंदा ४ नोव्हेंबर रोजी ३२ अंश इतकी कमाल तापमानाची नोंद होत आहे. दिवसा अंगाला चटके देणारी ऊन्ह तर रात्री थंडी जाणवत आहे. याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होत आहे. यामुळे सर्दी, खोकला आदी आजारांच्या रुग्णात वाढ होत आहे. परिणामी रुग्णालये फुल्ल दिसत आहे. जिल्ह्यात किमान तापमान घसरत असल्याचे दिसून येते. यामुळे थोड्या प्रमाणात थंडी जाणवत आहे. ही थंडी गरम कपडे घालण्याइतपत नसल्याचे बोलले जात आहे.
शहरी भागात नसली तरी ग्रामीण भागात थोड्या प्रमाणात थंडी जाणवत असल्याचे चित्र आहे. सध्या शेतात उत्पन्न निघत आहे. तर काहींच्या शेतात ते उभे आहे. यामुळे शेतकरी शेतात जागलीला जात आहे. येथे थंडीची कुडकुड जाणत असल्याने शेकोटीचा आसरा घेत असल्याचे चित्र आहे. सध्या रात्रीचे तापामन गडगडत असल्याने तापमानात कमालीची घट होत असली तरी हुडहुडीला अजून प्रतीक्षा वर्धेकरांना करावी लागणार असल्याचे दिसते.
तूर पिकासाठी थंडी फायदेशीर, पण ढगाळ वातावरणाचे सावट
जिल्ह्यात खरीपात सोयाबीन, तूर, कपाशी तर रब्बी हंगामात गहू व चन्याचे मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. अनेक शेतात सध्या तुरीचे पीक मोठ्या प्रमाणात आहे. सध्या पडत असलेल्या थंडीचा लाभ या तुरीच्या पिकाला होणार आहे. थंडीमुळे या पिकांची जोमात वाढ होत असल्याचे शेतकरी सांगतात.
ढगाळ वातावरणामुळे तुरीवर अळीचा प्रकोप
थंडीचा जोर वाढत असताना अचानक गत दोन दिवसांपासून आकाशात काही प्रमाणात ढगाळी वातावरण येत आहे. याचा विपरीत परिणाम तुरीवर होत असून अळीरचा हल्ला होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या रात्रीला थंडी पडत असून त्याचा लाभ तुरीला होईल असे वाटत असताना या ढगाळ वातावरणामुळे धोक्याचे सावट घोंगावत आहे.