कारला येथील ३० एकरावरील घरे हटविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 06:00 IST2020-02-01T06:00:00+5:302020-02-01T06:00:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : पालकमंत्र्यांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन वर्धा वनपरिक्षेत्रातील कारला येथील ३० एकर झुडपी जंगलातील अतिक्रमण काढण्यासाठी ...

कारला येथील ३० एकरावरील घरे हटविणार
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पालकमंत्र्यांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन वर्धा वनपरिक्षेत्रातील कारला येथील ३० एकर झुडपी जंगलातील अतिक्रमण काढण्यासाठी वनविभागाने कंबर कसली आहे. त्यासाठीची कागदोपत्री कार्यवाही सध्या युद्धपातळीवर केली जात असून येत्या काही दिवसात वनविभागाच्या सदर ३० एकर जागेवरील घरे पोलीस बंदोबस्तात हटविली जाणार असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.
काही लोकप्रतिनीधींच्या वरद हस्ताने वनविभागाच्या या झुडपी जंगल जागेवर झपाट्याने नागरिकांनी अतिक्रमण केले. परंतु, ते वेळीच काढण्याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत होते. कुठल्याही परिस्थिती वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण होता कामा नये अशा सूचना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी दिल्यात. त्यानंतर कुंभकर्णी झापेचे सोंग घेणारा वनविभाग खडबडून जागा झाला आहे. विशेष म्हणजे या भागातील अतिक्रमण धारकांना यापूर्वी वनविभागाच्यावतीने नोटीस बजावण्यात आले आहेत.
परंतु, त्यानंतर कारवाई थंडबस्त्यात पडली होती. पालकमंत्र्यांकडून सूचना प्राप्त होताच वनविभागाने पुन्हा एकदा नव्या जोमाने अतिक्रमण काढण्यासाठी कंबर कसली आहे.
परस्पर झाले खरेदी-विक्रीचे व्यवहार?
वनविभागाच्या जागेवर मनमर्जीने अतिक्रमण करून पक्के घर बांधण्यात आली. इतकेच नव्हे तर काही राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने काही अतिक्रमण धारकांनी सदर जागेचा खरेदी-विक्रीचा व्यवहार केल्याचेही वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या चौकशीत पुढे आले आहेत. परंतु, परस्पर खरेदी-विक्रीचा व्यवहार करणाºयांवर वनविभाग काय कारवाई करणार याबाबत सध्या मोठी गुप्तता बाळगली जात आहे.
५८ च्यावर व्यक्तींचे अतिक्रमण
वर्धा शहराशेजारी असलेल्या मौजा कारला येथील सर्वे क्रमांक ९८ आराजी ३.६४ हेक्टर, सर्व क्रमांक ९९ आराजी ७.९२ हेक्टर व ०.७२ हेक्टर ही जागा महसूल विभागाने काही वर्षांपूर्वी वनविभागाकडे वळती केली होती. त्याची नोंदही महसूल विभागाने घेतली आहे. परंतु, याच जागेवर सध्या तब्बल ५८ च्यावर व्यक्तींनी अतिक्रमण करून पक्के घर बांधली आहेत. हेच अतिक्रमण वनविभाग आता काढणार आहे.