जनजागृती आणि प्रतिरोधातूनच हिवतापावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 23:53 IST2018-04-24T23:53:49+5:302018-04-24T23:53:49+5:30
जागतिक आरोग्य संघटनेमार्फत २५ एप्रिल हा दिवस ‘जागतिक हिवताप दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. हिवतापाविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण करून जनतेपर्यंत किटकजन्य आजाराची जनजागृती व संदेश पोहोचविण्याकरिता आरोग्य खात्यामार्फत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

जनजागृती आणि प्रतिरोधातूनच हिवतापावर मात
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जागतिक आरोग्य संघटनेमार्फत २५ एप्रिल हा दिवस ‘जागतिक हिवताप दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. हिवतापाविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण करून जनतेपर्यंत किटकजन्य आजाराची जनजागृती व संदेश पोहोचविण्याकरिता आरोग्य खात्यामार्फत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीची सुरुवात जिल्हा क्रीडा संकुल येथून होणार आहे. शहरातील विविध मार्गाने मार्गक्रमण करून बापूकुटी परिसर सेवाग्राम येथे रॅलीचा समारोप होणार आहे.
‘तयारी हिवतापास हरविण्याची’ या वर्षाच्या घोषवाक्यानुसार प्रत्येकाने सहभाग घेतला पाहिजे. हिवतापावर मात करावयाची असेल तर शासकीय यंत्रणेसोबतच जनतेचा प्रभावी सहभाग घेणे गरजेचे असल्याने या मोहिमेची सविस्तर माहिती करून घेणे आवश्यक आहे.
डासांमार्फत प्रसारित होणारे प्रमुख रोग म्हणजे हिवताप, हत्तीरोग, चिकुनगुनिया डेंग्यू व जापनिज एन्सेलायटीस (जेई) हे आहेत. या रोगाचा प्रसार वेगवेगळ्या प्रसार डासांमार्फत होत असतो. हिवताप व डासांपासून होणाऱ्या इतर आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व बाबी जाणून घेणे गरजेचे आहे. हिवताप नियंत्रण ही एकट्या शासनाची जबाबदारी नसून ती प्रत्येकाची जबाबदारी आहे. मागील तीन वर्षांत जिल्ह्यात १६८ रक्त नमुुने दूषित आढळले आहे. त्यामुळे गंभीरता अधिक आहे. तद्वतच किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमात जनतेचा सहभाग आणि सहकार्य घेण्याचे दृष्टीने दरवर्षी जून महिना ‘हिवताप विरोधी जनजागरण महिना’ म्हणून साजरा होतो. जून महिन्यात मानसूनचे आगमनासोबतच सर्वत्र डासांमुळे होणाऱ्या आजारांमध्ये वाढ होते. या आजारावर मात करण्यासाठी शासन सर्वस्तरावर प्रयत्नशिल असते. शासनाच्या या प्रयत्नांना जनतेच्या सहभागाची आवश्यकता आहे. लोकसहभाग मिळण्यावरच लोकांच्या वर्तणुकीत बदल घडवून त्यांचे चांगल्या सवयीत रूपांतर करून आजारास प्रतिबंध करता येवू शकेल.
‘डासांपासून संरक्षण, हिवतापापासून रक्षण’
प्रतिबंधात्मक उपाय जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये आरोग्य विभागामार्फत जनजागृती केली जाते. यात प्रत्येकाने आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून घरासभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, परिसरात पाणी साचू देवू नये, खड्डे बुजवावे. साचलेली गटारी वाहती करावी, छतावरील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण लावावे. आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळावा, घरात किटकनाशक मच्छरदाणीचा वापर करावा, जमिनीवरील टाक्या, डासोपत्ती स्थाने यामध्ये गप्पी मास्यांचा वापर करावा, संडासचे व्हेट पाईपला घरगुती कापड बांधावा व ताप आल्यास आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत रक्त नमुना तपासून घ्यावा, ‘डासांपासून संरक्षण, हिवतापासून रक्षण’ या उक्तीप्रमाणे हिवताप नियंत्रण सुद्धा माणसाच्याच हातात आहे.