तळीरामांना आवर घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:00 IST2020-06-20T05:00:00+5:302020-06-20T05:00:02+5:30

वर्धा जिल्हा दारूबंदी असला तरी येथे देशी, विदेशी, गावठी दारू राजरोसपणे विकली जाते. या अवैद्य व्यवसायात जिल्ह्यात १० हजारांवर लोक गुंतलेले आहेत. गावागावात दारू विक्रीला कुटीर उद्योगाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.कमी श्रमात मोठा मोबदला यात मिळत असल्याने अनेकजण यात सहभागी आहेत.

Control upon drunkers | तळीरामांना आवर घाला

तळीरामांना आवर घाला

ठळक मुद्देग्रामीण भागात संसर्गाची भीती : दोन ठाण्यांची पोलीस यंत्रणा सुस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : महसूल, ग्रामपंचायत, आरोग्य विभागाच्या संयुक्त प्रयत्नाने नागरिकांच्या सहकार्याने कारंजा तालुक्यांत कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रूग्ण आढळलेला नाही. पण कारंजा तालुक्यातील अनेक गावांत तळीरामांचे दुसऱ्या तालुक्यांतून आवागमन सुरू असल्यामुळे या तालुक्यात कोरोनाचा केव्हा शिरकाव होईल याचा नेम नाही.
दारूबाजांच्या भटकंतीमुळे आणि अवैद्य दारू निर्मिती व विक्रीमुळे अनेक खेड्यातील सामान्य जनता कोरोनाच्या दहशतीखाली जगत आहे. कारंजा तालुक्यात दारूबंदी सध्यातरी पोलीस यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे कागदावरच दिसून येत आहे. कारंजा पोलीस ठाण्याचा भार कमी करण्यासाठी कारंजा तालुक्यातील पारडी बोटोणा, सारवाडी, जसापूर, नरसिंगपूर, एकांबा, किन्हाळा अशी १५ ते २० गावे तळेगाव पोलीस ठाण्याला जोडल्या गेली आहेत. बहुतांश सर्व गावे जंगलाला लागून आहे. तळेगाव पोलीस ठाण्याचे या सर्व गावांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे. त्यामुळे काही गावात सर्रास अवैद्य दारू निर्र्मिती व विक्री सुरू आहे. सारवाडी आणि पारडीमध्ये दारूचा पूर आहे. एकट्या पारडी गावांत जंगलाला लागून २५ हून अधिक अवैद्य दारू भट्ट्या आहेत. येथे दारू सहज उपलब्ध होत असल्यामुळे आष्टी तालुक्यातील थार आणि सभोवतालचे नारा, आजनादेवी , एकांबा, बोटोना येथील ‘तळीराम’ छुप्या जंगली मार्गाने, आपली दारूची हौस भागविण्याकरीता पायी किंवा सोयीच्या वाहनानी पारडीला येतात. आणि सामान्य जनतेला कोरोनाचा धोका निर्माण करतात. तळेगाव पोलीस ठाण्याचे या गावांतील या अवैद्य व्यवसायाकडे आणि वाहतुकीकडे दुर्लक्ष आहे. नागपूर सिमेला लागून असलेल्या बोरी, ठाणेगांव, धतीमुर्ती, कन्नमवारग्राम या गावामध्ये सुद्धा काटोल व नागपूरवरून रात्री बे-रात्री दारूची वाहतूक सुरू असते.
रेड झोन असलेल्या नागपूर जिल्ह्यातून कारंजात येत असलेल्या दारूमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. कारंजा पोलीस ठाण्याने रात्रीची गस्त वाढविणे गरजेचे आहे. कारंजा तालुक्यांतील अवैद्य दारू निर्र्मिती आणि विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यापुर्वी अनेक गावांत महिला व युवक दारूबंदी मंडळ कार्यरत होती. सामाजिक कर्तव्य म्हणून उत्स्फुर्तपणे काम करणारी मंडळी पोलीस यंत्रणेची साथ व सरंक्षण न मिळाल्यामुळे निष्क्रीय झाली. आपोआपच या असामाजिक व्यवसायाला रान खुले झाले आहे. पुन्हा गावखेड्यांचे सामाजिक आरोग्य राखण्यासाठी पोलीस यंत्रणेने, तालुक्यांतील दारूबंदीसाठी कर्तव्य बजावणे अवैद्य दारू निर्मिती व विक्रेत्यांना साथ न देता दारूबंदी मंडळांना मनापासून साथ देणे आवश्यक आहे.

दारूविक्री व्यवसाय झाला कुटीरोद्योग
वर्धा जिल्हा दारूबंदी असला तरी येथे देशी, विदेशी, गावठी दारू राजरोसपणे विकली जाते. या अवैद्य व्यवसायात जिल्ह्यात १० हजारांवर लोक गुंतलेले आहेत. गावागावात दारू विक्रीला कुटीर उद्योगाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.कमी श्रमात मोठा मोबदला यात मिळत असल्याने अनेकजण यात सहभागी आहेत.

Web Title: Control upon drunkers