रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या अटीची पूर्तता करण्याकडे नागरिकांचा कानाडोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 22:14 IST2019-08-07T22:14:19+5:302019-08-07T22:14:49+5:30
भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करण्यासाठी प्रत्येक घर आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांच्या आवारात वॉटर हार्वेस्टिंगचा वापर होणे गरजेचे आहे. परंतु, प्रभावी जनजागृतीअभावी हा विषय थंडबस्त्यात आहे.

रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या अटीची पूर्तता करण्याकडे नागरिकांचा कानाडोळा
महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करण्यासाठी प्रत्येक घर आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांच्या आवारात वॉटर हार्वेस्टिंगचा वापर होणे गरजेचे आहे. परंतु, प्रभावी जनजागृतीअभावी हा विषय थंडबस्त्यात आहे. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षीपासून वर्धा नगरपलिकेने बांधकाम परवानगी घेताना वॉटर हार्वेस्टिंग क्रमप्राप्त केले आहे.
शिवाय उन्हाळ्याच्या दिवसात जलसंकटाला सामोरे जावे लागल्याने यंदा वर्धा शहरातील अनेक नागरिकांनी वॉटर हार्वेस्टिंग घर आणि व्यावसायिक प्रतिष्ठान परिसरात केले आहे. परंतु, त्याची नोंद नगरपालिकेने घेतली नाही. रेन वॉटर हार्वेस्टिंग ही काळाची गरज असल्याने त्याबाबत वैद्यकीय जनजागृती मंच व वर्धा न.प.च्यावतीने जनजागृती करण्यात येत आहे. यंदा स्वत: नगराध्यक्षांनी या विषयी पुढाकार घेतला होता. त्यामुळे नवीन बांधकाम करणाऱ्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंग नकाशात नमूद नसल्यास त्यांना बांधकाम परवानगीच देण्यात आली नाही.
ही वर्धा नगरपालिकेची भूमिका असली तरी कागदावर रेन वॉटर हार्वेस्टिंग दाखविणारे प्रत्यक्षात कृती करतात काय, याचीही शहानिशा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांनी केली पाहिजे, अशी अपेक्षा जल जागृतीसाठी काम करणाºयांना आहे.
मालमत्ता करात मिळते २ टक्के सूट
घर किंवा व्यावसायिक प्रतिष्ठानाचे बांधकाम करताना रेन वॉटर हार्वेस्टिंगचा अवलंब केल्यास त्या मालमत्ता धारकाला मालमत्ता करात २ टक्के सूट दिली जात आहे. शिवाय प्रभावी जनजागृतीसाठी विविध सामाजिक संघटनांना सोबत घेतले जाईल. तर प्रत्यक्ष कृती न करणाºयांना भोगवटदार प्रमाणपत्र देण्यात येणार नाही.
- प्रदीप जगताप, मुख्याधिकारी, न.प.वर्धा.
अन्यथा जलसंकटाला सामोरे जावे लागेल
शहरात भूगर्भातील पाण्याचा वारेमाप उपसा होतो. त्या तुलनेत जमिनीत पाणी जिरविण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. मागील काही वर्षांत सर्वत्र सिमेंटीकरण झाल्याने जमिनीत नैसर्गिकरीत्या पाणी जिरणेदेखील बंद झाले आहे. याकरिता प्रत्येकाने पावसाचे पाणी बोअरवेल, विहिरींमध्ये सोडून पाणी पुनर्भरण करणे आज काळाची गरज आहे. अन्यथा भविष्यात भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागणार आहे.
- डॉ. सचिन पावडे, अध्यक्ष, वैद्यकीय जनजागृती मंच, वर्धा.
असे केले जाते जल पुनर्भरण
पावसाच्या पाण्याची साठवण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) म्हणजे पुनर्वापरासाठी पावसाचे पाणी जमा करणे. पावसाचे पाणी घराच्या छतावरून एका मोठ्या जमिनीखालच्या टाकीमध्ये गोळा करतात. तर काही ठिकाणी साठवावयाचे पाणी खोल खड्डा (विहीर, शाफ्ट किंवा बोअरहोल), पाझर असलेल्या जलाशयांत साठवतात. पाणी जाळी किंवा इतर साधनांसह दव किंवा धुक्यातूनही गोळा केले जाते. हे माणसासाठी अपेय असलेले पाणी गार्डन, पशुधन, सिंचन वा घरगुती वापरासाठी घेता येते.