दालनासमोर ठिय्या : सकारात्मक चर्चेअंती आंदोलन मागे लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कारंजा तालुक्यातील कारप्रकल्पासाठी सुसुंद्रा व माणिकवाडा येथील शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहीत केली. याला १८ वर्षांचा कालावधी लोटूनही मोबदला देण्यात आला नाही. मंगळवारी मरणशय्येवर असलेल्या वृद्धाला घेवून प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. मोबदल्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या दिला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेअंती आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्त्व प्रहारचे बाळा जगताप यांनी केले. कार प्रकल्पाच्या कालव्याकरिता सुसुंद्रा व माणिकवाडा येथील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या; मात्र, गुलाब लाहेबर, गणपत उईके, मैनाबाई उईके व रामा आत्राम यांना अद्याप मोबदला मिळाला नाही. वेळोवेळी संबंधीतांना निवेदने देऊनही काहीच उपयोग झाला नाही. या शेतकऱ्यांची कागदोपत्री अधिग्रहीत जमिनीची नोंद नव्हती. या नोंदीकरिता प्रहार संघटनेच्यावतीने दफन आंदोलन केल्यानंतर त्यांची नोंद घेण्यात आली. माणिकवाडा व सुसंद्रा येथील शेतकऱ्यांना मोबदल्याची अल्पशी रक्कम मिळाली. रक्कम देताना अनेक प्रकरणात नको तेवढ्या चूका प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केल्या. यात शेतकऱ्यांना नाहक त्रासाचा सामना करावा आगल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. जमिनी गेलेल्या चार वयोवृद्ध प्रकल्पग्रस्तांना मोबदला न मिळाल्याने त्यांना वैद्यकीय उपचार घेणेही कठीण झाले आहे. पोटासाठी या वयातही त्यांना झटावे लागत आहे. यामुळे त्यांचा थकीत मोबदला तात्काळ द्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली होती. मोबदल्याच्या मागणीसाठी आलेल्या वयोवृद्धांची दैना पाहून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्वत: दालनाबाहेर येत आंदोलकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी निम्मी रक्कमही दिली. शासनाच्या यादीत सदर प्रकल्पग्रस्तांचे नाव आहे की नाही याची चौकशी करून तात्काळ योग्य कार्यवाही करण्याचे आदेशही सहायक पुर्नवसन अधिकारी दांडेकर यांनी दिल्याने आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.
कार प्रकल्पग्रस्तांची जिल्हाकचेरीवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:38 AM