५४९ शाळांमध्ये स्वातंत्र्य दिनी एकाचवेळी वृक्षारोपण
By Admin | Updated: August 15, 2015 02:13 IST2015-08-15T02:13:42+5:302015-08-15T02:13:42+5:30
वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये जनतेचा सहभाग वाढविण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्येही या मोहिमेमधून जागृती निर्माण करण्यासाठी शनिवारी भारतीय स्वातंत्र्य ...

५४९ शाळांमध्ये स्वातंत्र्य दिनी एकाचवेळी वृक्षारोपण
सामाजिक वनीकरणचा उपक्रम: दहा हजार ९८० विविध प्रजातींची रोपे
वर्धा : वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये जनतेचा सहभाग वाढविण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्येही या मोहिमेमधून जागृती निर्माण करण्यासाठी शनिवारी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांनंतर जिल्ह्यातील ५४९ शाळांमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सामाजिक वनीकरण विभागातर्फे जिल्हा परिषदेच्या ५२५ व नगरपरिषदेच्या २४ शाळांमध्ये वृक्षारोपणाकरिता १० हजार ९८० विविध प्रजातींचे रोपे उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती वनीकरणचे उपसंचालक प्रवीणकुमार बडगे यांनी दिली आहे.
वृक्षारोपण मोहीम उपवनसंरक्षक, उपसंचालक सामाजिक वनीकरण तसेच जिल्हा परिषद व नगर परिषदेमार्फत राबविण्यात येणार आहे. तालुकास्तरावर वनपरीक्षेत्र अधिकारी, तालुका लागवड अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांच्या समन्वयाने वृक्षारोपणाचे कार्यक्रम शाळांमध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत.
शाळा परिसरामध्ये असलेलया मोकळ्या जागेत, संरक्षणासाठी कुंपण आणि पाण्याची सोय असलेल्या शाळांची या मोहिमेसाठी निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये वर्धा येथील ३८, सेलू ४५, देवळी ५९, हिंगणघाट १०३, समुद्रपूर ९४, आर्वी १२६, आष्टी ४१ आणि कारंजा तालुक्यातील ४३ शाळांची निवड करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या २४ शाळांच्या परिसरातही सामाजिक वनिकरण व वनविभागातर्फे वृक्ष लागवडीसाइी खड्डे खोदण्यासोबतच रोपेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. झेंडा वंदनानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम या शाळांमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या मोहिमेसाठी फळ देणारी वृक्ष आंबा, चिंच, आवळा, कवठ तसेच सावली देणारी वृक्ष वड, पिंपळ, कडुनिंब, कॅसिचा, पळस, रेन ट्री, फुले देणाऱ्या वृक्षांमध्ये गुलमोहर आदी वृक्ष लावण्यात येणार आहेत.
वृक्षारोपणानंतर वृक्ष संवर्धनासाठी किमान चार वर्ष पाणी पुरविणे तसेच संगोपन करण्याची जबाबदारी संबंधित शाळांची राहणार आहे. ज्या शाळांमध्ये वृक्षलागवड, संरक्षण आणि देखभालीमध्ये उत्कृष्ट कार्य करतील, अशा शाळांना तालुका, जिल्हा व विभागस्तरावर पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय हरित सेना शाळांच्या धर्तीवर पर्यावरण रक्षक सेना हा उपक्रमही राबविण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक वनिकरण विभागाने दिली आहे.(प्रतिनिधी)