'उत्तर प्रदेशातून गुंडाराज आणि माफिया राजवट पूर्णपणे संपुष्टात, आता...' मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 13:35 IST2025-08-26T13:33:45+5:302025-08-26T13:35:35+5:30
Mafia-Free Uttar Pradesh : उत्तर प्रदेशच्या जनतेने योग्य सरकार निवडलं असून गेल्या ८ वर्षात राज्य प्रगतीपथावर असल्याचा विश्वास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला.

'उत्तर प्रदेशातून गुंडाराज आणि माफिया राजवट पूर्णपणे संपुष्टात, आता...' मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले..
गोरखपूर : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये दोन कल्याण मंडपमचे लोकार्पण करताना सांगितले की, आता उत्तर प्रदेशात माफिया प्रवृत्ती पुन्हा कधीही वर्चस्व गाजवू शकणार नाही. गेल्या आठ वर्षांत उत्तर प्रदेशातून गुंडाराज आणि माफिया राजवट पूर्णपणे संपुष्टात आणली असून, आता सामान्य नागरिक, व्यापारी आणि महिला-मुली सुरक्षित आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मानबेला आणि राप्तीनगर येथे बांधलेल्या कल्याण मंडपमच्या लोकार्पणावेळी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले, “आठ वर्षांपूर्वी कोणी कल्पनाही करू शकत नव्हते की उत्तर प्रदेश दंगलमुक्त आणि माफियामुक्त होईल. पण आज ही एक वस्तुस्थिती आहे. माफिया प्रवृत्ती मुळापासून उखडून टाकण्यात आली आहे. आता येथे गुंड कुणाच्याही सुरक्षिततेसाठी धोका ठरू शकत नाहीत.”
चांगल्या शासनाचा परिणाम : विकास आणि गुंतवणूक
मुख्यमंत्री म्हणाले की, २०१७ पासून राज्याने चांगले सरकार निवडले, म्हणूनच हा सकारात्मक बदल शक्य झाला. चांगल्या सरकारचा विचार चांगल्यासाठी असतो. त्यांनी जनतेला प्रश्न विचारला की, 'उत्तर प्रदेशात गुंतवणूक, फोरलेन कनेक्टिव्हिटी, बंद पडलेले खत कारखाने पुन्हा सुरू करणे किंवा नवीन उद्योग उभारण्याबद्दल कोणी विचारही करू शकत नव्हते.' पण आज देशभरात सर्वाधिक गुंतवणूक उत्तर प्रदेशात होत आहे. मोठ्या-मोठ्या कंपन्या येत आहेत, सर्वत्र फोरलेन रस्त्यांचे जाळे पसरत आहे आणि गोरखपूरचा बंद पडलेला खत कारखाना पुन्हा सुरू झाला आहे.
गोरखपूरमध्ये आरोग्य सेवेचा कायापालट
यावेळी मुख्यमंत्री थोडे भावुक झाले. ते म्हणाले, आठ वर्षांपूर्वी याच काळात 'इन्सेफेलायटिस' या आजाराने अनेक मुलांचा जीव जात होता. परंतु, 'डबल इंजिन सरकार'ने या आजारावर नियंत्रण मिळवले आणि 'आजारी' मानसिकतेवरही उपचार केले. पूर्वी बीआरडी मेडिकल कॉलेजसारखी मोठी रुग्णालये स्वतःच आजारी होती, पण आता ती रुग्णांना उत्तम सेवा देत आहेत. गोरखपूरमध्ये एम्सची स्थापना झाल्यामुळे आरोग्य सुविधा अधिक चांगल्या झाल्या आहेत.
'सबका साथ, सबका विकास'
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, पूर्वीच्या सरकारांमध्ये योजनांचा लाभ चेहरा किंवा पक्ष पाहून दिला जात होता. मात्र, आता ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्रानुसार सर्वांना लाभ दिला जात आहे. गेल्या आठ वर्षांत ५७ लाख गरजूंना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळाला आहे. शहराच्या दक्षिणेकडील रामगढताल आणि उत्तरेकडील चिलुआताल आता पर्यटन केंद्रे बनली आहेत.
गोरखपूरमध्ये सुरू असलेल्या विकासामुळे आता तरुणांना रोजगारासाठी बाहेर जावे लागत नाही, तर त्यांना घरच्या जवळच नोकरी मिळत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी २०२४ पर्यंत 'विकसित भारत'च्या संकल्पाप्रमाणेच 'विकसित उत्तर प्रदेश' आणि 'विकसित गोरखपूर'चा संकल्प करण्याचे आवाहन जनतेला केले. कल्याण मंडपमसारख्या अभिनव प्रकल्पाची सुरुवात गोरखपूरमध्ये झाली असून, आता हे मॉडेल इतर शहरांमध्येही स्वीकारले जात आहे, याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.