Bihar Election: "जे जनावरांचा चाराही खातात, ते माणसांचे हक्क देखील गिळतात"; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा लालूंवर प्रहार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 01:10 IST2025-10-30T01:09:39+5:302025-10-30T01:10:53+5:30
Yogi Adityanath Latest News: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बिहारमध्ये दुसरी प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी चारा घोटाळ्यावरून लालू प्रसाद यादव यांच्यावर हल्ला चढवला.

Bihar Election: "जे जनावरांचा चाराही खातात, ते माणसांचे हक्क देखील गिळतात"; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा लालूंवर प्रहार
Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असून, राजकारण तापले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची बिहारमधील शाहपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राकेश रंजन ओझा यांच्या समर्थनार्थ प्रचारसभा झाली. योगी आदित्यनाथ यांनी राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर टीकेचे बाण डागले.
योगी आदित्यनाथ म्हणाले, "इंद्र देवांच्या आशीर्वादाने बिहारमध्ये पुन्हा एनडीएचे सरकार बनेल, हे निश्चित झाले आहे."
काँग्रेस आणि राजद निशाण्यावर
मुख्यमंत्री योगी यांनी काँग्रेस आणि राजदवर थेट निशाणा साधला. ते म्हणाले की, "या लोकांनी विकासकामे पूर्ण केली नाहीत, कारण जे जनावरांचा चाराही खातात, ते माणसांचे हक्क देखील गिळतात. आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली 'सबका साथ, सबका विकास' या भावनेने प्रत्येक तरुण, गरीब, शेतकरी, माता-भगिनीला सरकारी योजनांचा लाभ दिला जात आहे. मोदीजींच्या कार्यकाळात २५ कोटींहून अधिक लोक दारिद्र्य रेषेच्या बाहेर येऊन स्वावलंबनाच्या मार्गाने पुढे जात आहेत."
मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले की, "आता बिहारमधून स्थलांतर होत नाही, उलट येथून बाहेर पडलेले अभियंते बिहारला प्रगतीच्या मार्गावरून पुढे नेत आहेत. येथील तरुणांमध्ये ईश्वरदत्त बुद्धिमत्ता आहे. थोडासे प्रोत्साहन मिळाले तर बिहारचा तरुण जगाला आपल्या बुद्धीने चकीत करू शकतो."
राजद आणि काँग्रेसच्या काळात महिलांची सुरक्षा 'राम भरोसे'
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बिहारच्या भूमीवरील महापुरुष आणि लोकशाही पुरस्कर्त्यांचा उल्लेख केला. ते म्हणाले, "इथला भूतकाळ गौरवशाली होता, परंतु राजदचे १५ वर्षांचे आणि त्यापूर्वीचे काँग्रेसचे सरकार हे कलंकपेक्षा कमी नव्हते. त्या काळात बिहारच्या नागरिकांना स्वतःच्या अतिस्त्वाच्या संकटातून जावे लागत होते. तरुण पलायन करत होते, शेतकरी आत्महत्या करत होते, व्यापारी भीतीच्या सावटाखाली होते आणि आया बहिणींची सुरक्षा देवाच्या भरवशावर होती", अशी टीका योगींनी केली.
"२००५ मध्ये बिहारने कूस बदलली आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार आले, तेव्हा माफियांची उलट गिनती सुरू झाली आणि बिहारने नवीन दिशेने वाटचाल सुरू केली. आज बिहारमध्ये सर्वांगिण विकास झाला आहे, जो ५० वर्षांपूर्वी व्हायला हवा होता. यात कनेक्टिव्हिटी, पूर व्यवस्थापन, शालेय शिक्षण, वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालये आणि गरिबांसाठी अनेक योजनांचा समावेश आहे", असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.
बुलडोजर माफियांच्या छातीवर चालतो
प्रचारसभेच्या ठिकाणी बुलडोजर पाहून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, "भाजप एनडीए सरकार जे बोलते, ते करून दाखवते. 'आम्ही माफिया राज संपवू' असे सांगितले होते आणि ते करून दाखवले. उत्तर प्रदेशात माफियांच्या छातीवर बुलडोजर चालतो, तेव्हा समाजवादी पार्टी आणि त्यांच्या भागीदारांना फक्त श्रद्धांजली वाहण्याची संधी असते. बिहार देखील जंगलराजमधून बाहेर पडून प्रगतीचे नवे आदर्श स्थापित करत आहे."
राम मंदिराला विरोध करणारे पक्ष
योगींनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करत बिहारच्या नागरिकांना विचारले की राम मंदिर बनल्याने आनंद झाला आहे का? नागरिकांनी होकारार्थी उत्तर दिले. ते म्हणाले की, "काँग्रेस, राजद आणि उत्तर प्रदेशातील त्यांचा साथीदार समाजवादी पक्ष राम मंदिराला विरोध करत होते. हे लोक अयोध्येत राम मंदिराचे निर्माण करू शकले नसते. काँग्रेस म्हणायची की राम कधी झालेच नाहीत. राजदने म्हटले की आम्ही मंदिर बनू देणार नाही, तर सपाने रामभक्तांवर गोळ्या चालवल्या होत्या."
योगी म्हणाले, "आम्ही तेव्हाही म्हणत होतो की गोळ्या चालो अथवा लाठ्या रामलल्ला आम्ही घेऊन येऊ आणि मंदिर तिथेच बनवू. आज मंदिर बनले आहे. बिहारच्या विकासाची सध्याची गती थांबता कामा नये. 'डबल इंजिन' सरकार बुलेट ट्रेनच्या वेगाने बिहारची प्रगती वाढवू शकेल, यासाठी मतदारांनी कमळाला मतदान करावे, असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केले.