लाईट्स बंद करणे अनिवार्य, आवाजावर मर्यादा; रात्री १० नंतर ट्रेनमध्ये लागू होतात 'हे' ५ नियम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 12:36 IST2026-02-18T12:35:15+5:302026-02-18T12:36:37+5:30
Indian Railways Night Rules: तुम्ही वारंवार रेल्वेने प्रवास करता का? मग रेल्वेचे नियम तुम्हाला माहित असणे अत्यंत गरजेचे आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि शांततापूर्ण व्हावा यासाठी रेल्वेने रात्री १० ते सकाळी ६ या वेळेसाठी काही कडक नियम केले आहेत.

लाईट्स बंद करणे अनिवार्य, आवाजावर मर्यादा; रात्री १० नंतर ट्रेनमध्ये लागू होतात 'हे' ५ नियम!
भारतीय रेल्वे ही देशाची जीवनवाहिनी मानली जाते. दररोज लाखो नागरिक रेल्वेने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात. प्रवाशांचा हा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि आरामदायी व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने अनेक नियम केले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या झोपेत व्यत्यय येऊ नये, यासाठी रात्री १० वाजेनंतर काही कडक नियम लागू होतात. जर तुम्ही वारंवार रेल्वेने प्रवास करत असाल, तर तुम्हाला हे नियम माहित असणे अत्यंत आवश्यक आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
१) टीटीई तिकीट तपासू शकत नाही
रेल्वेच्या नियमानुसार, रात्री १० वाजल्यानंतर टीटीई प्रवाशांना झोपेतून उठवून तिकीट तपासू शकत नाही. तिकीट तपासणीची प्रक्रिया रात्री १० च्या आधीच पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, ज्या प्रवाशांचा प्रवास रात्री १० नंतर सुरू होतो, त्यांना हा नियम लागू नाही.
२) मिडल बर्थचा नियम
लोअर बर्थवर बसण्यावरून अनेकदा मिडल बर्थच्या प्रवाशांसोबत खटके उडतात. नियमानुसार, मिडल बर्थचा प्रवासी रात्री १० ते सकाळी ६ या वेळेतच आपला बर्थ उघडू शकतो. सकाळी ६ वाजल्यानंतर त्याला बर्थ खाली करावाच लागतो, जेणेकरून खालच्या बर्थवरील प्रवासी बसू शकतील.
३) मोबाईल आणि स्पीकरवर बंदी
रात्री १० नंतर डब्यात मोठ्या आवाजात बोलणे किंवा मोबाईलवर जोरात गाणी किंवा व्हिडिओ पाहणे गुन्हा ठरू शकतो. जर तुम्हाला गाणी ऐकायची असतील, तर इयरफोन वापरणे अनिवार्य आहे. इतर प्रवाशांच्या तक्रारीनंतर रेल्वे पोलीस संबंधित प्रवाशावर कारवाई करू शकतात.
४) जेवणाची ऑर्डर
रेल्वेच्या पँट्री कारमधून किंवा ई-केटरिंगद्वारे तुम्ही रात्री १० नंतर जेवण मागवू शकत नाही. तथापि, रेल्वेमध्ये रात्री १० पूर्वी नोंदवलेली ऑर्डर पोहोचवली जाऊ शकते. रात्री उशिरा प्रवासादरम्यान काही खाण्याची सवय असल्यास डबा किंवा खाद्यपदार्थ सोबत ठेवावे.
५) ग्रुपने गप्पा मारण्यावर मर्यादा
अनेकदा ग्रुपने प्रवास करणारे लोक रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत बसतात. नियमानुसार, रात्री १० नंतर मोठ्या आवाजात गप्पा मारून इतरांच्या झोपेत व्यत्यय आणणे चुकीचे आहे. तक्रार झाल्यास प्रवाशांना समज दिली जाते किंवा दंड आकारला जातो.