उल्हासनगरमध्ये तरुणाचे अपहरण करून खंडणीची मागणी
By सदानंद नाईक | Updated: March 17, 2026 19:14 IST2026-03-17T19:14:27+5:302026-03-17T19:14:44+5:30
Ulhasnagar Crime News: कॅम्प नं-१, साधुबेला स्कुलजवळ, तेजूमल चक्की परिसरात राहणारे नंदलाल लालचंद सुथार यांच्या २२ वार्षित पुतण्याचे अपहरण केल्याचा व्हाट्सअप कॉल १५ मार्च रोजी सकाळी साडे आठ वाजता आला.

उल्हासनगरमध्ये तरुणाचे अपहरण करून खंडणीची मागणी
- सदानंद नाईक
उल्हासनगर - कॅम्प नं-१, साधुबेला स्कुलजवळ, तेजूमल चक्की परिसरात राहणारे नंदलाल लालचंद सुथार यांच्या २२ वार्षित पुतण्याचे अपहरण केल्याचा व्हाट्सअप कॉल १५ मार्च रोजी सकाळी साडे आठ वाजता आला. अपहरण कर्त्यांनी सुथार यांच्याकडे खंडणीची मागणी केली असून याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर कॅम्प नं-१ परिसरात राहणारे नंदलाल लालचंद सुथार हे कारपेंटरचे काम करतात. १५ मार्च रोजी सकाळी साडे आठ वाजता त्यांच्या मोबाईल फोनवर व्हाट्सअप कॉल आला. कॉल करणाऱ्यांनी सुथार यांना धमकी देत सांगितले की त्यांचा २२ वर्षीय पुतण्या भगवतीप्रसाद मनफुल सुथार याचे अपहरण केल्याचे सांगितले. पुतण्या जिवंत पाहिजे असल्यास ५ हजार रुपयाची खंडणी मागितली. सुथार यांचा पुतण्या दिघा नवीमंबई परिसरात कामाला जातो. घाबरलेल्या नंदलाल यांनी उल्हासनगर पोलीस ठाणे गाठून झालेला सर्व प्रकार पोलिसांना कथन केला.
उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी घटनेचे गांभीर्य बघून पोलिसांच्या दोन टीम बनवून तपासासाठी पाठविल्या. मात्र दोन दिवसानंतर अपहरण तरुणाचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अपहरण झालेल्या भगवतीप्रसाद सुधार या तरुणाचे मोबाईल लोकेशन कळवा व नवीमुंबई येथील दिघा हे दोन दिवसापूर्वी दाखविले होते. अशी माहिती पोलीस अधिकारी संतोष आव्हाड यांनी दिली. यावेळी अपहरणाचा छेडा दोन्ही पोलीस टीम लावणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अपहरणकर्त्यांनी फक्त ५ हजार रुपये खंडणी मागितल्याने, पोलिसांनाही आश्चर्य वाटले असून यामध्ये दुसरा प्रकारतर नाही ना? असा प्रश्नही पोलिसांना पडला आहे.