लग्नसोहळे होताहेत धूमधडाक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:36 IST2021-03-22T04:36:32+5:302021-03-22T04:36:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर शहरात कोरोनाचा नियम पाळण्यात प्रशासन आणि पोलीस प्रशासन दोघेही अपयशी ठरत ...

लग्नसोहळे होताहेत धूमधडाक्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर शहरात कोरोनाचा नियम पाळण्यात प्रशासन आणि पोलीस प्रशासन दोघेही अपयशी ठरत आहेत. नियम मोडून लग्न सोहळे किंवा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. दुसरीकडे तक्रारी करूनही त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.
अंबरनाथ आणि बदलापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे, तसेच लग्न आणि अंत्यसंस्कार विधीसाठी अटी घातल्या आहेत. तरी देखील या अटींची योग्य दखल घेतली जात नसल्याचे समोर आले आहे. बदलापूर शहर आणि ग्रामीण भागात आजही लग्नसोहळे मोठ्या धूमधडाक्यात साजरे केले जात आहेत. या ठिकाणी होणाऱ्या गर्दीकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शहरात काही मोजक्याच हॉलमध्ये लग्नसोहळ्यासाठी अटींचे पालन केले जाते. मात्र, इतर हॉलमध्ये वर आणि वधू त्यांच्या कुटुंबीयांच्या जबाबदारीवर लग्नसोहळे थाटात पार पाडत आहेत. एवढेच नव्हे तर पोलीस प्रशासनाला हाताशी धरून या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिसांनी येऊ नये यासाठी तडजोडीचा मार्ग अवलंबला जातो.
अंबरनाथ शहरात अनेक ठिकाणी गर्दी करून सार्वजनिक कार्यक्रम घेतले जात आहेत. शहरातील महत्त्वाचे मॅरेज हॉल आजही गर्दीने फुललेले दिसत आहेत. यासंदर्भात कोणीही तक्रार करण्यासाठी पुढे येत नसल्याने पोलीसही गुन्हा दाखल करण्यासाठी चालढकल करीत आहेत. हीच परिस्थिती बदलापुरात निर्माण झाली आहे.
--------------------
हॉटेलमधील कार्यक्रमाला गर्दी
अंबरनाथच्या जांभूळ भागात असलेल्या एस.थ्री पार्क या हॉटेलमध्ये गुरुवारी सायंकाळी एक सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. शेट्टी समाज बंड मुंबई कमिटीने या ठिकाणी गेट टूगेदर आयोजित केले होते. या कार्यक्रमाला १५० जणांची उपस्थिती होती. शिवाय कोरोना नियमांची येथे पायमल्ली करण्यात आली. त्यामुळे याची दखल घेत हॉटेल मॅनेजर आणि आयोजकांवर अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.