बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा जपतोय, त्या त्रिसुत्रीवर आम्ही आमचा कारभार करतो -एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 23:05 IST2026-04-05T22:48:18+5:302026-04-05T23:05:12+5:30
ठाणे : 'बाबासाहेबांचे उपकार कधीही विसरता येणारे नाहीत. आज आम्ही जेव्हा सरकार म्हणून काम करतो तेव्हा बाबासाहेबांची समता, स्वातंत्र्य ...

बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा जपतोय, त्या त्रिसुत्रीवर आम्ही आमचा कारभार करतो -एकनाथ शिंदे
ठाणे : 'बाबासाहेबांचे उपकार कधीही विसरता येणारे नाहीत. आज आम्ही जेव्हा सरकार म्हणून काम करतो तेव्हा बाबासाहेबांची समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही त्रिसुत्री आमची मार्गदर्शक असते. या त्रिसुत्रीवर आम्ही आमचा कारभार करतो. हाच विचारांचा वारसा महायुती सरकार जीवापाड जपत आहे. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांसाठी असणाऱ्या योजनांचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवून सामाजिक न्यायाचे तत्त्व जपतोय', असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केले.
बुद्धरत्न सन्मान सोशल वेल्फेअर पाऊंडेशन आयोजित आठवी आंतरराष्ट्रीय बौद्धधम्म परिषद रविवारी गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत शिंदे यांना करुणासागर बुद्ध रत्न पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला.
पुरस्काराला उत्तर देताना ते म्हणाले की, या गौरवाबद्दल मी स्वत:ला अत्यंत भाग्यवान समजतो. या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी आणखीन वाढली आहे. तुम्ही दाखवलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही असा शब्द देतो.
पुढे मार्गदर्शनपर भाषणात शिंदे म्हणाले की, '१४ ऑक्टोबर १९५६ रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदिक्षा घेतली. लाखो लोकांना समानतेचा आणि स्वाभिमानाचा मार्ग मिळवून दिला. बाबासाहेबांनी आपल्याला केवळ संविधान दिले नाही, तर या मातीला बुद्धांचा धम्म पुन्हा मिळवून दिला. बाबासाहेबांमुळे माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री होऊ शकलो', अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
'आज जगभरातील शांतता आणि स्थैर्य धोक्यात आहे, सीमांवर तणाव आहे, निरपराध नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे, लहान मुलांचे बळी जात आहेत याचे वाईट वाटत आहे. आपण मानवता विसरुन चाललो आहोत. युद्धाच्या झळा संपूर्ण जगाला सोसाव्या लागत आहेत. अशा काळात भगवान गौतम बुद्धांची शिकवण जगाला वाचवू शकते', असे मत देखील शिंदे यांनी व्यक्त केले.
या परिषदेचे मुख्य आयोजक बुद्धरत्नसागर सोशल वेलफेअर फाऊंडेशनचे संस्थापक-संचालक भंते रत्नप्रिय थेरो, राहुल लोंढे, सहआयोजक प्रमोद इंगळे यांच्यासह प्रमुख उपस्थितीत भंते विशुद्धानंद महाथेरो, भंते विनय बोधी महाथेरो, भंते के. आर. लामा, भंते डॉ. राजरत्न थेरो, भंते शांतीरत्न थेरो, भंते आरा आनंद थेरो, भंते संबोधी थेरो आणि भंते शिलबोधी थेरो यांच्यासह देश-विदेशातील भिक्खू संघातील अनेक मान्यवर उपस्थित होते.