उल्हासनगर महापालिकेचा सावळा गोंधळ, महापौर हक्काच्या दालनापासून वंचित; स्थायी समिती हॉलचा घ्यावा लागतोय आसरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 18:43 IST2026-02-11T18:41:19+5:302026-02-11T18:43:16+5:30
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांची निवड होऊनही त्यांना हक्काची दालने अद्याप उपलब्ध झालेली नाहीत.

उल्हासनगर महापालिकेचा सावळा गोंधळ, महापौर हक्काच्या दालनापासून वंचित; स्थायी समिती हॉलचा घ्यावा लागतोय आसरा
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांची निवड होऊनही त्यांना हक्काची दालने अद्याप उपलब्ध झालेली नाहीत. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे महापौर अश्विनी निकम यांना सध्या स्थायी समिती सभापतींच्या कार्यालयात बसण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, निवडणुकांपूर्वीच ही कामे पूर्ण होणे अपेक्षित असताना, निवडीनंतरही दुरुस्तीचे काम संथ गतीने सुरू असल्याचा फटका लोकप्रतिनिधींना बसत आहे.
उल्हासनगर महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर महासभागृह, महापौर आणि उपमहापौर यांच्या दालनांच्या दुरुस्तीची जबाबदारी बांधकाम विभाग आणि आयुक्तांवर असते. मात्र, प्रत्यक्ष निवडीच्या आदल्या रात्रीपर्यंत महासभागृहाचे काम रखडलेले होते. निवडीनंतर उपमहापौरांच्या दालनाचे काम कसेबसे पूर्ण करण्यात आले, मात्र महापौरांच्या कार्यालयाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. महापौर दालनाच्या दुरुस्तीचे काम अद्याप सुरू असल्याने महापौर अश्विनी निकम यांना अधिकृत दालन मिळालेले नाही. त्या सध्या स्थायी समिती हॉलचा वापर कामकाजासाठी करत आहेत.
उपमहापौरांच्या दालनाचे काम पूर्ण झाल्याने त्यांनी तेथे बसण्यास सुरुवात केली असली तरी, इतर किरकोळ दुरुस्त्या अजूनही सुरू आहेत. महापालिका बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश शिरसाटे यांच्याशी कार्यालय नूतनीकरण संदर्भात संपर्क होऊ शकला नाही. मात्र उपअभियंता संदीप जाधव यांनी महापौर व उपमहापौर दालनाच्या दुरुस्तीचे काम वेगात सुरू असून येत्या आठवड्यात ते पूर्ण होईल. अशी माहिती दिली आहे.
महापालिकेने महापौर आणि उपमहापौर निवडीपूर्वीच दोन्ही कार्यालयांची दुरुस्ती पूर्ण करणे गरजेचे होते. सध्या माझ्या कार्यालयाचे काम पूर्ण झाले असून मी तेथे बसण्यास सुरुवात केली आहे. मात्र, महापौर अश्विनी निकम यांच्या कार्यालयाचे काम अद्याप सुरू असून येत्या आठवड्यात ते पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे."
(अमर लुंड, उपमहापौर, उल्हासनगर महानगरपालिका)