भिवंडी दिवाणी न्यायालय इमारतीचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांच्या हस्ते होणार उद्घाटन
By नितीन पंडित | Updated: October 4, 2022 17:37 IST2022-10-04T17:37:01+5:302022-10-04T17:37:41+5:30
याप्रसंगी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील,राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण,उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार,शर्मिला देशमुख यादी मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत.

भिवंडी दिवाणी न्यायालय इमारतीचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांच्या हस्ते होणार उद्घाटन
भिवंडी -भिवंडी येथील दिवाणी न्यायालय (क. स्तर) व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग या न्यायालयाच्या नूतन भव्य तीन मजली इमारतीचे उद्घाटन बुधवारी विजयादशमीच्या मुहूर्तावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते तसेच मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता न्यायालय प्रांगणात संपन्न होणार आहे.
याप्रसंगी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील,राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण,उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार,शर्मिला देशमुख यादी मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजक ठाणे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय मंत्री व भिवंडी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड मंजीत राऊत हे आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने व भिवंडी बार असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विधी पदवी प्राप्त करण्याला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने त्या शताब्दी वर्षा निमित्त भिवंडी बार असोसिएशनच्या सहकार्याने सुरू करण्यात येणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेचे उदघाटन मान्यवरांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती अध्यक्ष अँड मंजित राऊत यांनी दिली आहे. या व्याख्यान माला शृंखले मध्ये तज्ञ विधिज्ञ यांचे विधी विषयक मार्गदशन भिवंडी येथे आयोजित करण्यात येणार आहे.
भिवंडी न्यायालय इमारतीचे वैशिष्ट्य :
तळ अधिक तीन मजली भव्य इमारत
एकूण क्षेत्रफळ ७४२४. ८६ चौरस मीटर
११९ दालन तर १६ न्यायदान कक्ष
महिला व पुरुष वकील मंडळींसाठी स्वतंत्र बार रूम
प्रशासकीय खर्च ३८ कोटी १५ लाख ७० हजार
इमारत उभारणी प्रारंभ १९ जून २०१८
इमारत बांधकाम पूर्णत्व ३० ऑगष्ट २०२२
उदघाटन कार्यक्रमामुळे शहरातील वाहतुकीत बदल-
या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित राहणार असल्याने भिवंडी शहरातील वाहतूक ठिकठिकाणी वळविण्यात आली आहे.तर शहरात येणारी वाहने,एस टी बस या शहरा बाहेरच थांबविण्यात येणार आहेत.त्या बाबतची अधिसूचना वाहतूक विभागाकडून काढण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक या कार्यक्रम काळात थांबविण्यात आली आहे .