दिवसा ‘सलाम साब’ अन् रात्री मात्र दुकान साफ
By जितेंद्र कालेकर | Updated: May 29, 2025 13:15 IST2025-05-29T13:14:38+5:302025-05-29T13:15:02+5:30
ठाण्यात एका रात्रीत १४ दुकानांवर डल्ला मारणारे सुरक्षारक्षक जेरबंद

दिवसा ‘सलाम साब’ अन् रात्री मात्र दुकान साफ
जितेंद्र कालेकर
ठाणे : दिवसा रखवाली आणि रात्री चाेऱ्या करणाऱ्या नेपाळच्या महंत कामी (२३) आणि विष्णू कामी (३६) या दोन सुरक्षारक्षकांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अलीकडेच माेठ्या काैशल्याने अटक केली. त्यांच्याकडून ठाणे, मुंबईतील ९ गुन्ह्यांची उकल झाली. नाैपाड्यातील दुकानांमधील चाेरीच्या मालासह दोन लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.
घटनास्थळापासून जवळच असलेल्या वेगवेगळ्या ८० ते १०० सीसीटीव्हींमधील फुटेजच्या पडताळणीच्या आधारे पाेलिसांनी दाेघांना अटक केली. ठाण्यातील चरई भागात १२ मार्च २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास एकाच रात्रीत सलग १४ गाळ्यांचे शटर उचकटून चोरी झाल्याचा गुन्हा नौपाडा पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. या चोऱ्यांचा समांतर तपास पाेलिस आयुक्त आशुताेष डुंबरे यांनी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविला होता. पाेलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. यातच चोरटे चोरी केल्यानंतर वेगवेगळ्या मार्गाने निघून गेल्याचे आढळले.
..अशी होती चोरीची पद्धत
यातील महंत हा मार्केट परिसरातील बंद दुकानांचे शटर उचकटून चोरी करायचा, तर विष्णू हा काही अंतरावर लांब उभा राहून रेकी करीत असल्याचे उघड झाले.
या दोघांनीही ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई परिसरात चोरीचे नऊ गुन्हे केले हाेते. नऊपैकी चार गुन्हे दोघांनी, तर उर्वरित पाच हे महंत याने साथीदारांच्या मदतीने केल्याचेही तपासात उघड झाले.
महंत आणि विष्णू हे दाेघेही मूळचे नेपाळी आहेत. महंत मीरारोड, तर विष्णू उल्हासनगर भागात सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होता. दोघेही दिवसा सुरक्षारक्षक म्हणून काम करायचे, तर रात्री चाेऱ्या करीत असल्याची माहिती तपासात समाेर आली. विष्णूविरोधात मीरा भाईंदरमध्ये एक गुन्हा यापूर्वी दाखल झाला आहे.
रिक्षाचालक, हॉटेल व्यावसायिक यांच्याकडील चौकशी आणि सीसीटीव्ही तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या दुव्याद्वारे महंत आणि विष्णू या दोघांनाही २० मार्च रोजी गुन्हे शाखेने अटक केली. उपनिरीक्षक दीपक घुगे यांच्या पथकाने या चोरट्यांकडून साहित्य जप्त केले.
..असा लागला छडा
महंत हा भाईंदरमधून रिक्षाने ठाण्यात उतरला. हेच फुटेज पाेलिसांच्या हाती लागले. महंतच्या पाठाेपाठ उल्हासनगरमधून विष्णूही आला. महंत ज्या रिक्षाने ठाण्यात पाेहोचला त्या रिक्षाचालकाला भिवंडीतून ताब्यात घेतले. तेव्हा त्याने या प्रवाशाला भाईंदरमधून आणल्याचे सांगितले. त्यानंतर भाईंदर गाठून महंतला अटक केली आणि या संपूर्ण चाेऱ्यांचा उलगडा झाला.