आरटीईच्या १०८०० जागा अद्याप रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 03:17 AM2018-09-22T03:17:39+5:302018-09-22T03:17:55+5:30

दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्यांतर्गत २५ टक्के जागा आरक्षित ठेवल्या आहेत.

RTE 10800 seats still vacant | आरटीईच्या १०८०० जागा अद्याप रिक्त

आरटीईच्या १०८०० जागा अद्याप रिक्त

Next

ठाणे : दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्यांतर्गत २५ टक्के जागा आरक्षित ठेवल्या आहेत. यानुसार, ठाणे जिल्ह्यात १६ हजार ५४६ जागा ६४० शाळांमध्ये राखीव आहेत. त्यापैकी आतापर्यंत चौथ्या फेरीअखेर सुमारे पाच हजार ७४७ जागांवर प्रवेश झाले. जिल्हाभरात अजून १० हजार ७९९ जागा रिक्त आहेत. या प्रवेशास विलंब झाल्यामुळे पालकांचा त्यास प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे पाचव्या फेरीसाठी प्रवेश प्रक्रिया होण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा आहे.
लाखो रुपये खर्च करून दर्जेदार शिक्षण देणाºया इंग्रजी व अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये मुलांचे केजी ते पहिलीच्या वर्गांचे शालेय प्रवेश श्रीमंत पालक घेतात. याप्रमाणे आर्थिक दुर्बल घटक, मागासवर्गीय परिवारांतील मुलामुलींनादेखील या शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्यासाठी जिल्ह्यातील शाळांमध्ये प्रवेश राखीव ठेवले. पण, शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही आरटीईच्या राखीव जागांवर प्रवेश सुरू आहेत. त्यास पालकांकडून मात्र प्रतिसाद मिळत नसल्याची बाब या चौथ्या फेरीअखेर उघड झाली. या फेरीमध्ये २७६ बालकांचे प्रवेश निश्चित केले होते. त्यापैकी केवळ ६७ बालकांचे प्रवेश घेण्यात आले. उर्वरित पाच अर्ज रिजेक्ट केले आणि २०६ बालकांच्या आईवडिलांनी संबंधित शाळांमध्ये संपर्कच साधलेला नसल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
प्ले ग्रुप, प्री-केजी, ज्युनिअर केजी, सीनिअर केजी आणि फर्स्ट म्हणजे पहिलीच्या वर्गात या २५ टक्के आरक्षणातून बालकांना मोफत प्रवेश आहे. शिक्षणाचा हक्क या कायद्याखाली जिल्ह्यातील दर्जेदार शिक्षण देणाºया ६४० शाळांमध्ये या १० हजार ७९९ जागा आजपर्यंत शिल्लक आहेत. पहिल्या दोन फेºयांद्वारे पाच हजार ३५२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. आता तिसºया फेरीअखेर ९३९ निवडलेल्यांपैकी ३२८ जणांचे प्रवेश झाले. उर्वरित ४७६ जणांनी संबंधित शाळेत प्रवेश घेतले नाही आणि आता चौथ्या फेरीत केवळ ६७ बालकांचे प्रवेश झाले आहेत. प्रवेश घेण्याच्या या प्रक्रियेस विलंब होत आहे.
जागा रिक्त असूनही विद्यार्थ्यास दूरवरून यावे लागण्याच्या कारणाखाली काही शाळा विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारत आहेत. काही विविध कागदपत्रे, आधारकार्ड आदींच्या त्रुटी काढून प्रवेश नाकारले जात आहेत. पालकांना चांगली वागणूक न देता अपमानित करण्याचादेखील प्रयत्न काही शाळांमध्ये होत असल्याच्या तक्रारी आहेत. शाळेतील साहित्य, गणवेश, स्कूलबस प्रवास आदी शुल्कांबाबतदेखील पालक व शाळांमध्ये शाब्दिक चकमकी होत असल्यामुळे प्रवेश रखडले जात आहेत. काहींकडे मोबाइल नसल्यामुळे निवड झाल्याचा निरोप वेळेत न मिळाल्याची समस्यादेखील या आरटीई प्रवेशात ऐकायला मिळत आहे.

Web Title: RTE 10800 seats still vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.