अपघातात ठार झालेल्या पोलिसांच्या नातेवाईकांना ५६ लाखांची भरपाई देण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 21:52 IST2021-03-18T21:50:26+5:302021-03-18T21:52:38+5:30
ट्रेलरचे मालक आणि रिलायन्स वीमा कंपनीने ही भरपाई सात टक्के व्याजाच्या दराने संबंधित पोलीस हवालदाराच्या नातेवाईकांना देण्याचे आदेश न्यायाधिकरणाचे सदस्य आर. एन. रोकडे यांनी दिले आहेत.

ठाणे मोटार वाहन अपघात न्यायाधिकरणाचा निकाल
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मुंबई नाशिक राष्टÑीय महामार्गावर बेफिकिरीने उभ्या असलेल्या एका ट्रेलरच्या धडकेत पोलीस वाहनामधील ४७ वर्षीय पोलीस हवालदाराचा चार वर्षापूर्वी मृत्यु झाला होता. याच प्रकरणामध्ये अपघातामध्ये मृत पावलेल्या पोलीस कुटूंबीयांच्या नातेवाईकांना ५६ लाखांची भरपाई देण्याचे आदेश ठाणे मोटार वाहन अपघात न्यायाधिकरणाने गुरुवारी दिले आहेत.
ट्रेलरचे मालक आणि रिलायन्स वीमा कंपनीला ही भरपाई सात टक्के व्याजाच्या दराने संबंधित पोलीस हवालदाराच्या नातेवाईकांना देण्याचे आदेश न्यायाधिकरणाचे सदस्य आर. एन. रोकडे यांनी दिले आहेत. ठाणे ग्रामीणचे ४७ वर्षीय पोलीस हवालदार प्रमोद निवतकर (नेमणूक, वासिंद पोलीस स्टेशन) हे २८ डिसेंबर २०१६ रोजी मुंबई - नाशिक महामार्गावरुन त्यांच्या पोलीस जीपने प्रवास करीत होते. त्यावेळी कोणताही दिवा न लावताच रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रेलरला या जीपची धडक बसली होती. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या प्रमोद यांचा उपचारादरम्यान त्याच दिवशी मृत्यु झाला होता. ट्रेलर चालकाने कोणताही सिग्नल न देता, बेफिकिरीने रस्त्यातच हा ट्रेलर उभा केल्यामुळेच हा गंभीर अपघात झाल्याचे न्यायाधिकरणाचे वकील एच. पी. पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. कुटूंबातील एकमेव कमवते असलेल्या प्रमोद यांना ४६ हजार ६८२ इतके वेतन होते. वीमा कंपनीने प्रकरण दाखल करुनही ट्रेलर मालक हजर झाला नव्हता. त्यामुळे हे प्रकरण निश्चित झाले. परावर्तकांशिवाय रस्त्यावर वाहन उभे करणे हे अत्यंत धोक्याचे आहे, हा ट्रेलर चालकाचा अक्षम्य गुन्हा असल्याचे निरीक्षणही न्यायाधीकरणाने नोंदविले. त्याच पार्श्वभूमीवर प्रमोद यांच्या दोन्ही मुलांच्या नावाने प्रत्येकी १५ लाख रुपये राष्टÑीयकृत बँकेत गुंतविण्यात यावेत. तसेच दहा लाख रुपये त्याच्या पत्नीच्या नावाने आणि पाच लाख रुपये त्याच्या वयस्कर आईला तर उर्वरित ११ लाखांची रक्कम पत्नीला धनादेशाने देण्याचे आदेश न्यायाधिकरणाने बुधवारी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.