मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 16:49 IST2025-06-09T16:49:08+5:302025-06-09T16:49:43+5:30
Eknath Shinde on Mumbai Train Accident: जखमींवर तातडीने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देश

मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
Eknath Shinde on Mumbai Train Accident: मध्य रेल्वेच्या दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून पाचपेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ही घटना घडली. फास्ट लोकल एकमेकांच्या शेजारून जात असतानाच एका प्रवाशाची बॅग दुसऱ्या ट्रेनमधील प्रवाशाला घासली. त्यामुळे काही प्रवासी ट्रेनमधून खाली पडले. ट्रॅकवर पडल्याने काहींचा मृत्यू झाला तर काहींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेनंतर राजकीय प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे ट्विट करत म्हणाले, "मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी झालेल्या भयंकर अपघातामुळे मी खूप व्यथित झालो आहे. ही अतिशय दुःखदायक घटना आहे. रोज सकाळी हजारो प्रवासी या मार्गावरून ये जा करतात. मी मृतांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. जखमींवर तातडीने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देश ठाणे आणि कळवा येथील रुग्णालयांना दिले असून मी स्वतःदेखील डॉक्टरांशी बोललो आहे. रेल्वेमार्फत सदर दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून दुर्दैवी अपघाताचे नेमके कारण या चौकशीतून लगेच समोर येईल."
मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी झालेल्या भयंकर अपघातामुळे मी खूप व्यथित झालो आहे. ही अतिशय दुःखदायक घटना आहे. रोज सकाळी हजारो प्रवासी या मार्गावरून ये जा करतात. मी मृतांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. जखमींवर तातडीने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देश ठाणे आणि कळवा येथील…
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 9, 2025
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
"दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण ८ प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे," असे ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले.