गणरायाला दिला भावपूर्ण निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:54 IST2017-09-01T00:53:51+5:302017-09-01T00:54:20+5:30
अंबरनाथमध्ये गौरी गणपतीचे विसर्जन उत्साहात झाले. पावसाने विश्रांती घेतल्याने भाविकांना विसर्जनाच्यावेळी कुठलाही अडथळा आला नाही.

गणरायाला दिला भावपूर्ण निरोप
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये गौरी गणपतीचे विसर्जन उत्साहात झाले. पावसाने विश्रांती घेतल्याने भाविकांना विसर्जनाच्यावेळी कुठलाही अडथळा आला नाही. सर्वाधिक गणेशमूर्तींचे विसर्जन हे चिंचपाडा येथील तलाव आणि शिवमंदिर येथील कुंडात करण्यात आले.
सायंकाळी ५ नंतर पावसाने विश्रांती घेतल्याने अनेक घरगुती गणपती आणि गौरींचे विसर्जन झाले. फटाक्यांची आतषबाजी आणि पारंपारिक वाद्यांच्या तालावर नाचत मिरवणुका काढण्यात आल्या. ज्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले त्यात घरगुती गणपतींची संख्या सर्वाधिक होती. चिंचपाडा तलावात दोन ठिकाणी विसर्जनाची सोय केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना आखल्या होत्या. पोलिसांचाही चोख बंदोबस्त होता. मोठ्या वाहनांना मिरवणुकीच्या रस्त्यांवर बंदी घातली होती. तसेच भाविकांना गणेश विसर्जनासाठी पाण्यात उतरण्यास मनाई केली होती. मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी पालिका आणि सामाजिक संस्थांनी कार्यकर्ते ठेवले होते. प्रकाश व्यवस्थाही करण्यात आली होती. नगरसेवक प्रदीप पाटील आणि उमेश पाटील यांच्या वतीनेही विसर्जनाच्या ठिकाणी विशेष व्यवस्था केली होती.
शिवमंदिर येथील कुंडातही पालिकेच्यावतीने विसर्जनाची सोय करण्यात आली होती. त्या ठिकाणीही भाविकांनी गणेशमूर्तींचे विसर्जन केले. सोबत जावसई तलाव, वडवली तलवातही विसर्जनाची सोय केली होती.
विसर्जनासाठी उल्हास नदीचा पर्याय
बदलापूर : बदलापूरमध्ये गौरीगणपतींचे मोठ्या उत्साहात विसर्जन झाले. बदलापूरमधील भाविकांनी विसर्जनासाठी उल्हास नदीचाच पर्याय निवडला. वाहते पाणी असल्याने आणि मूर्तीचे पावित्र्य टिकवण्यासाठी भाविकांनी उल्हास नदीच्या तीरावरच गर्दी केली होती.
बदलापूरमध्ये रमेशवाडी परिसरातील उल्हासनदी चौपाटीवर विसर्जनासाठी भाविक आले होते. एरंजाड येथील उल्हासनदीच्या तीरावर देखील भाविकांनी गर्दी केली होती. ग्रामीण भागातील गणेशमूर्तीही याच ठिकाणी आणल्या होत्या. या सर्व ठिकाणी पालिकेच्या वतीचे सुरक्षेची व्यवस्था केली होती. कोणताही अपघात घडल्यास बचाव पथकही तैनात केले होते. कुळगावातील गावदेवी तलावातही भाविक मोठ्या संख्येने आले होते.