आधुनिक काळातही ‘त्यांची’ रोजी-रोटी गाढवांच्या पाठीवर
By Admin | Updated: February 8, 2017 03:58 IST2017-02-08T03:58:42+5:302017-02-08T03:58:42+5:30
जग कितीही अधुनिकतेकडे गेले तरी आजही समाजातील अनेक दुर्बल घटकांना आपल्या पोटा-पाण्यासाठी वणवण भटकंती करायला लावणारे पारंपरीक व्यवसाय करावे लागत

आधुनिक काळातही ‘त्यांची’ रोजी-रोटी गाढवांच्या पाठीवर
राहुल वाडेकर, विक्रमगड
जग कितीही अधुनिकतेकडे गेले तरी आजही समाजातील अनेक दुर्बल घटकांना आपल्या पोटा-पाण्यासाठी वणवण भटकंती करायला लावणारे पारंपरीक व्यवसाय करावे लागत आहेत. वाडा आणि विक्रमगड तालुक्यातील गावागावात सध्या गाढवांच्या पाठीवर दगडी जाते आणि पाटे वाहून नेऊन ती विकणारे पाथरवट दिसत दिसत आहेत. या व्यवसायातून जे काही मिळेल त्यामध्ये कुटुंबाची गुजराण करायाची असा त्याचा नित्यक्रम असून जा दिवशी मिळेल त्या दिवशी तुपाशी नाही मिळेल त्या दिवशी उपाशी असे त्यांचे जगण्याचे गणित आहे.
सध्या पाथरवट समाजातील काही कुटुंब आपल्या गाढवांसह उदरनिर्वाहासाठी सध्या जळगावहून स्थलांतर करून विक्र मगड आणि वाडा तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पाली येथे रस्त्याच्या कडेला तंबू टाकून राहायला आलेले आहेत.
घरातील पुरुष दररोज सकाळ झाल्यानंतर आपल्या छिन्नी आणि हातोड्याच्या मदतीने आपल्या कलेच्या सहायाने बनविलेली दगडी जाते-पाटे, वरवंटा, रगडा गाढवांच्या पाठीवर लादून गावोगावी विकण्याचा प्रयत्न करीत असतात. एखाद्या दिवशी २ ते ३ जाती विकली जातात तर एखाद्या दिवशी एकही जाते-पाटे विकले जात नाही. मात्र, पोटा-पाण्यासाठी त्यांना ही भटकंती करावीच लागते. एक जाते ४०० ते ५०० रूपयाला आणि २५० ते ३०० रुपयाला पाटा- वरवंटा विकला जातो.
छिन्नी-हातोड्याचे घाव घालून दगडापासून उखळ, पाटा-वरवंटा व जाते आदी वस्तू तयार करणाऱ्या पाथरवट समाजाची आता फक्त जगण्यासाठी धडपड सुरु आहे. कारण या सर्व दगडी वस्तूंची जागा आता मिक्सर, ग्रार्इंडर सारख्या विविध इलेक्ट्रॉनिक साधनांनी घेतल्याने या दगडी वस्तूंना मागणी नाही त्यामुळे हा व्यवसाय लोप पावत चालला आहे.
नोटाबंदीचा फटका
विक्र मगड येथील व्यवसायीक लाला आप्पा धिंडे हे गेल्या ७० वर्षांपासून हा व्यवसाय करीत आहे. परंतु आजवर अशी मंदी कधीच पाहिली नसल्याचे ते सांगत आहेत. कारण अगोदरच या व्यवसायाला आधुनिक युगामध्ये तयार होत असलेल्या इलेक्ट्रॉनीक वस्तंूमुळे घरघर लागली आहे. आता त्यामध्ये भर पडली आहे ती नोटाबंदीची. जव्हार, विक्र मगड, मोखाडा व ग्रामीण भागामध्ये मंदीचे सावट पसरलेले असल्याने हया आठवडाभरात बोहोणी सुध्दा झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
दगडी उखळ हे शुभ कार्याच्यावेळी घरातील देवघरात पुजले जाते मुखत्वेकरुन उखळीची गरज लग्नघरात लागतेच, तर पाटा देखील लग्नघरी नवरदेवाला अगर नवरीला लावण्यासाठी लागणारी हळद अदल्या दिवशी दळण्याकरीता व फोडण्याकरीता वापरतात व हे सारे आजही तितक्याच जुन्या रूढी परंपरेनुसार ग्रामीण भागात करतातच पण शहरी भागात या परंपरा जपल्या जात नसल्याचे दिसते. शहरात या चिजा मिळाल्या नाहीतर बऱ्याचदा त्या गावावरून मागवून ही परंपरा जपली जाते आहे. असे असले तरी हा व्यवसाय काळाच्या पडद्याआड जातो आहे.