मिरा - भाईंदरचा महापौर मराठीच हवा यासाठी मनसेची निवदर्शने
By धीरज परब | Updated: January 21, 2026 19:34 IST2026-01-21T19:32:59+5:302026-01-21T19:34:35+5:30
मीरा भाईंदर महापालिकेत भाजपाच्या ९५ पैकी ७८ जागा निवडून आल्याने भाजपचा महापौर होणार हे स्पष्ट आहे. तर दुसरीकडे मराठी महापौर असावा अशी मागणी मनसेने सुरु केली आहे.

मिरा - भाईंदरचा महापौर मराठीच हवा यासाठी मनसेची निवदर्शने
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीच्या निकाला नंतर आता महापौर मराठीच हवा ह्या मागणीसाठी मनसेने महापालिका मुख्यालया बाहेर निदर्शने केली. मराठी एकीकरण समिती पाठोपाठ मनसेने मराठी महापौर असावा अशी मागणी चालवली आहे.
मीरा भाईंदर महापालिकेत भाजपाच्या ९५ पैकी ७८ जागा निवडून आल्याने भाजपचा महापौर होणार हे स्पष्ट आहे. तर दुसरीकडे मराठी महापौर असावा अशी मागणी मनसेने सुरु केली आहे. बुधवारी महापालिका मुख्यालया बाहेर मनसे ने मराठी महापौर साठी निदर्शने केली. मनसेचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन पोपळे, विद्यार्थी सेनेचेशहर अध्यक्ष रॉबर्ट डिसोझा आदी सह मनसैनिक यांनी आंदोलन केले. मराठी महापौर हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा अश्या घोषणा मनसैनिकांनी दिल्या.
यावेळी सचिन पोपळे यांनी भाजपा आमदार नरेंद्र मेहतांवर टीका केली. भूमिपुत्र आगरी - कोळी आणि मराठी माणसांची तिकिटे कापून मेहतांनी अमराठी लोकांना उमेदवारी देण्याचे पाप केले आहे. ७८ पैकी केवळ ३६ मराठी नगरसेवक भाजपाने निवडून आणले. ७८ पैकी ७० मराठी आले असते तर आनंद होता. मात्र मराठी माणसांना खाली दाखवण्याचे काम करून मराठी लोकांचे खच्चीकरण मेहतांनी केले. काम करणाऱ्या मराठी माणसांना पराभूत करायला लावून ज्यांचे चेहरे व नाव लोकांना माहित नाही अश्या परप्रांतीयांना कमळाच्या चिन्हावर निवडून आणले. मराठी माणसांच्या टाळू वरचे लोणी खायचे काम मेहतांनी केल्याचा जाहीर आरोप पोपळे यांनी यावेळी केला.
मीरा भाईंदर हे महाराष्ट्रात असून मेहतांना विनंती आहे कि मराठी महापौर बसवा. या आधी मेहतांनी मराठी - अमराठी वाद उफाळून काढला होता. त्यावेळी पूर्ण महाराष्ट्र आणि मीरा भाईंदरच्या जनतेने पाहिले आहे कि, मराठी माणूस रस्त्यावर उतरला कि काय घडते. त्यामुळे त्या क्षणाची वाट न पाहता तुम्ही मराठी महापौर बसवावा. जर तुम्ही मराठी महापौर बसवला नाहीत तर या ठिकाणी आक्रोश आणि अशी आंदोलने होतील जे पूर्वी झाले नाही ते घडेल व त्याला मेहता हे जबाबदार असतील असा इशारा पोपळे यांनी दिला.
निवडणूक आयोग, आचार संहिता पथक, ईव्हीएम, बोगस मतदान, पुसली जाणारी शाही आणि भाजपाला एकहाती सत्ता मिळवल्या बद्दल शुभेच्छा आहेत असा टोला रॉबर्ट डिसोझा यांनी लगावला. मतदार याद्यांत घोटाळे केले. वारेमाप पैसा वाटला. जाती - धर्माच्या नावे लोकांना घाबरवले. अश्या विविध षडयंत्र आणि प्रशासन हातात घेऊन मराठी माणसांना हद्दपार करण्याचे काम भाजपाने चालवले असल्याचा आरोप यावेळी डिसोझा यांनी केला.
ह्या आधी मराठी एकीकरण समिती, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव व शहर अध्यक्ष संदीप राणे आदींनी मीरा भाईंदर मध्ये मराठी महापौर हवा अशी मागणी केली आहे. तर त्यांनी काय सांगितले त्याला उत्तर द्यायला मी बांधील नाही. पक्ष सांगेल तोच महापौर होईल. माझ्या पक्षाचा जो निर्णय असेल तोच माझा असे भाजपा आमदार नरेंद्र मेहतांनी म्हटलेले आहे.