लग्नाच्या भूलथापांना अल्पवयीन मुली ‘बळी’, अद्याप ९७ मुलींचा शोध सुरु
By जितेंद्र कालेकर | Updated: March 5, 2026 06:52 IST2026-03-05T06:51:47+5:302026-03-05T06:52:08+5:30
गेल्या आठवड्यात १३ वर्षीय दोन मुलींनी इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मित्राच्या सांगण्यावरून घर सोडले.

लग्नाच्या भूलथापांना अल्पवयीन मुली ‘बळी’, अद्याप ९७ मुलींचा शोध सुरु
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : लग्नाच्या आमिषाने मित्राने अल्पवयीन मुलींचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना वर्षभरापूर्वी वागळे इस्टेटमध्ये घडली होती. त्यानंतर या प्रकाराचे गांभीर्य अधिक अधोरेखित झाले. तरीही असे प्रकार कमी होण्याऐवजी वाढत आहेत. वर्षभरात ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात तब्बल ९८१ मुलींचे अपहरण झाले. त्यातील ८८४ मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. त्यातील ९७ मुलींचा शोध सुरू आहे.
गेल्या आठवड्यात १३ वर्षीय दोन मुलींनी इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मित्राच्या सांगण्यावरून घर सोडले. त्या थेट अकोला रेल्वेस्थानकात विनातिकीट प्रवास करताना आढळल्या. एकीचे नातेवाईक अकोला शहरात होते. या दोघींनाही त्यांच्या भांडुप येथील १५ वर्षीय मित्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर बाहेरगावी जाण्याची फूस लावली होती, तर कल्याणमध्येही दोन २० आणि २१ वर्षीय मुली सावत्र आई आणि वडिलांच्या मारहाणीमुळे घरातून बाहेर पडल्या होत्या. अंबरनाथमधील एका मित्राच्या घरी त्या आढळल्या होत्या. अशा घटनांमुळे चिंता व्यक्त होत आहे.
या वयात धोका अधिक
लग्नाच्या आमिषाने मित्रांनी किंवा ओळखीच्या व्यक्तींकडून मुलींना फूस लावल्याच्या ८० टक्के प्रकरणांमध्ये पोलिस तपासात आढळले. १६ ते १८ वयोगटातील मुलींच्या अशा अपहरणाचे प्रमाण अधिक आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२५ या काळात ९८१ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले. पैकी ८८४ मुलींचा शोध लागला. ९७ मुलींचा अजूनही शोध सुरू आहे.
लैंगिकतेबद्दल योग्य आणि शास्त्रीय माहिती नसल्यामुळे अनेकदा किशोरवयीन मुले, विशेषतः मुली, चुकीच्या प्रेमप्रकरणांना किंवा आमिषांना बळी पडतात. हे टाळण्यासाठी पालकांनी केवळ शिस्त न लावता मुलांशी मैत्रीचे नाते निर्माण करणे आवश्यक आहे.
- डाॅ. विक्रम वैद्य, मानसाेपचार तज्ज्ञ, ठाणे
वयोगट दाखल उघड उघड न
गुन्हे झालेले झालेले
० ते ७ ८ ८ ०
७ ते १२ २२ २१ १
१२ ते १६ ४०८ ३७८ ३०
१६ ते १८ ५४३ ४७७ ६६
एकूण ९८१ ८८४ ९७