"किमान त्यांना सामनाचे संपादकपद तरी द्यायला हवे होते; संजय राऊत यांच्यावर अन्याय"
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 05:08 IST2020-03-02T04:50:37+5:302020-03-02T05:08:24+5:30
किमान त्यांना सामनाचे संपादकपद तरी द्यायला हवे होते, असे मत व्यक्त करून आठवले यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला.

"किमान त्यांना सामनाचे संपादकपद तरी द्यायला हवे होते; संजय राऊत यांच्यावर अन्याय"
ठाणे : दिल्लीच्या दंगलीला काँग्रेस आणि आप हे दोन पक्षच जबाबदार आहे. त्यांनी ठरवले असते, तर ही दंगल थांबवू शकले असते, असा आरोप रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार रामदास आठवले यांनी रविवारी ठाण्यात एका खाजगी कार्यक्रमात केला. ज्या संजय राऊत यांच्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले, त्यांच्यावरच पक्षाने अन्याय केला. किमान त्यांना सामनाचे संपादकपद तरी द्यायला हवे होते, असे मत व्यक्त करून आठवले यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला.
राज ठाकरे यांनी प्रांतवादाची भूमिका सोडली, तर त्यांचे महायुतीत स्वागत आहे. परंतु, ते येण्या न येण्याने महायुतीला काही फरक पडणार नाही, असा दावा आठवले यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना केला. दिल्लीत दंगल आधी आपच्या नगरसेवकाने भडकवली.
त्यानंतर काँग्रेसने ती आणखी भडकवल्याचा आरोपही त्यांनी केला. केंद्रात आमचे सरकार असल्याने दंगलीसाठी आम्ही कसे जबाबदार, असा सवालही त्यांनी केला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीबद्दल त्यांनी सांगितले की, रिपाइंचा लवकरच मेळावा होणार आहे. मुंबई महानगरपालिकेत रिपाइं पूर्ण ताकदीने भाजपसोबत राहून शिवसेनेला पराभूत करणार आहे. मुंबईचा २०२२ चा महापौर भाजपचाच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलण्यास रिपाइंचा विरोध असून कोणत्याच भागाचे जुने नाव बदलले जाऊ नये, असे पक्षाला वाटते. मात्र, राज्य शासनाने ठरविले तर नावात बदल केला जाऊ शकतो, असे ते यावेळी म्हणाले.