कुमार आयलानी यांनी अधिकाऱ्याची घेतली शाळा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदारांची बैठकीला उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 17:48 IST2026-02-16T17:48:39+5:302026-02-16T17:48:48+5:30
उल्हासनगरातील कल्याण-अंबरनाथ रस्ता टार्गेटवर

कुमार आयलानी यांनी अधिकाऱ्याची घेतली शाळा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदारांची बैठकीला उपस्थिती
सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील कल्याण-अंबरनाथ रस्त्याचे काम सर्वांच्या टार्गेटवर आले असून आ. कुमार आयलानी यांनी राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांची सोमवारी आमदार कार्यालयात बैठक घेऊन रस्त्याच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. महापौर दौऱ्यानंतर रस्त्यातील ३ निकृष्ट ब्लॉक कापून पुन्हा रस्ता बांधण्याचा प्रकार गेल्या आठवड्यात उघड झाला आहे.
उल्हासनगरच्या मधोमध जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ रस्त्याच्या बांधकामाबाबत प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. त्यामुळे रस्ता सर्वांच्या टार्गेटवर आला आहे. गेल्या आठवड्यात महापौर अश्विनी निकम यांनी राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत मानकर, महापालिका बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश शिरसाठे यांच्या सोबत कल्याण ते अंबरनाथ रस्त्याची पाहणी करून रस्त्याच्या कामाच्या दर्जावर नाराजी व्यक्त केली होती. महापौरांची नाराजी घालविण्यासाठी बांधकाम विभागाने निकृष्ट झालेले ३ ब्लॉक कापून नव्याने बांधण्यास घेतले आहे. संपूर्ण रस्ता ६८ कोटीच्या निधीतून रस्त्यावर रस्ता बांधण्यात येत असल्याने, रस्ता तब्बल दिड फूट उंच झाळा. त्यामुळे दुकाने व घरे रस्त्याच्या खाली गेल्याचा आरोप होत आहे.
शहरातील कल्याण ते अंबरनाथ रस्त्याच्या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. कामाचा दर्जा आणि वेळ पाळणे बंधनकारक आहे. रस्ता बांधल्यानंतर रस्त्याचे ऑडिट करण्याचे संकेतही आ. आयलानी यांनी सोमवारी घेतलेल्या बांधकाम विभाग अधिकारी व ठेकेदाराच्या बैठकीत दिले. बैठकीला राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत मानकर, अनिल पाटील आणि संबंधित ठेकेदार उपस्थित होते. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत मानकर यांनी एप्रिल पूर्वी रस्त्याचे काम पूर्ण होणार असल्याचे सांगून निकृष्ट काम काढल्याचे म्हणाले.
कामातील त्रुटींवर ताशेरे
रस्ता बांधकामात येत असलेल्या तांत्रिक अडचणी आणि त्रुटींकडे आमदार आयलानी यांनी अधिकारी व ठेकेदाराचे लक्ष वेधत, त्या तातडीने सुधारण्याचे निर्देश दिले. रस्ता उंच झाल्याने, रस्ता शेजारील दुकानदारांना पावसाळ्यात कोणताही त्रास होऊ नये, यासाठी योग्य निचरा व्यवस्था आणि उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अनेक ठिकाणी रस्ता निकृष्ट झाल्याने, निकृष्ट ब्लॉक कापून नव्याने बांधल्याने, रस्तावर टिका होत आहे.
चौकांचे सुशोभीकरण
कल्याण ते अंबरनाथ रस्त्यात येणाऱ्या महत्त्वाच्या चौकांचे बांधकाम अधिक चांगल्या पद्धतीने आणि नियोजनबद्ध करण्यावर भर दिला जाणार आहे. रस्त्याच्या कामात जिथे कुठे जागेचे वाद असतील, ते नियमानुसार लवकरात लवकर सोडवून काम मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्याचे आयलानी म्हणाले आहेत.