केडीएमसीच्या कंत्राटी सफाई कामगार आणि वाहन चालकांचे बेमुदत आंदाेलन सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 15:25 IST2026-03-23T15:24:43+5:302026-03-23T15:25:22+5:30
कल्याण डोंबिवली महापालिकेतील कंत्राटी सफाई कामगार आणि वाहन चालकांनी विविध मागण्याकरीता सोमवारपासून श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली काम बंद आंदोलन केले आहे.

केडीएमसीच्या कंत्राटी सफाई कामगार आणि वाहन चालकांचे बेमुदत आंदाेलन सुरू
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेतील कंत्राटी सफाई कामगार आणि वाहन चालकांनी विविध मागण्याकरीता सोमवारपासून श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली काम बंद आंदोलन केले आहे. या कंत्राटी कामगारांनी महापालिका मुख्यालयासमोर ठिय्या दिला आहे.
या संदर्भात श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकारी जयश्री पाटील यांनी सांगितले की, महापालिकेने सेक्यूर नामक कंत्राटदाराला कचरा उचलण्याचे काम दिले होते. या कंत्राटदाराकडे काम करणारे कंत्राटी सफाई कामगार आणि कचरा वाहक गाडीवरील वाहन चालकांना आवश्यक त्या साेयी सुविधा पुरविल्या जात नाहीत. कंत्राटी कामगार अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांचा जीव धोक्यात घालून कचरा उचलण्याचे काम करतात.
दर महिन्याला वेळेवर त्यांना पगार दिला जात नाही. त्यांच्या पीएफ आणि आरोग्य विमा त्यांच्या पगारातून जमा केला जात नाही. आरोग्य विमा काढण्यात आलेला नाही. त्यांच्या पगाराची पावती त्यांना दिली जात नाही. काही कामगारांना अद्याप नियुक्ती पत्रे दिलेली नाहीत. कामगारांना दिवाळी बोनस त्यांच्या पूर्ण पगाराच्या तुलनेत दिला गेला पाहिजे. साप्ताहिक आणि सरकारी सुट्टी दिली जात नाही. कामावर असताना दुखापत अथवा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना वारसाना नुकसान भर दिली जात नाही. या विविध मागण्याकरीता हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
जोपर्यंत या मागण्या पूर्ण केल्या जात नाही. तोपर्यंत काम बंद ठेवण्यात येईल या निर्णयावर श्रमजीवी संघटना ठाम आहे. महापालिका मागण्यापूर्ण करीत नसल्याने कामगारांनी कचरा गोळा करणारी गाडीच महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आणून उभी केली आहे. यापूर्वीही श्रमजीवी संघनटेच्या वतीने अशा प्रकारचे आंदोलन केले होते. त्यावेळी प्रशासनाकडून मागण्याची पूर्तता केली जाईल असे आश्वासन दिले गेले होते. त्या आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याने आज पुन्हा बेमुदत काम बंद आंदोलन छेडण्यात आले आहे. भर उन्हात हे कामगार महापालिका मुख्यालयासमोर ठिय्या देऊन बसले आहे. महापालिका प्रशासनाकडून दुपारी ३ वाजेपर्यंत या आंदोलनाची दखल घेण्यात आलेली नव्हती.