राख्या वाढवणार कारगिलमधील जवानांचा ‘विश्वास’
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 00:42 IST2018-08-22T00:42:28+5:302018-08-22T00:42:50+5:30
रंगीबेरंगी दोन हजार राख्यांचे टार्गेट : मुले झाली तरबेज; विश्वास संस्थेचा उपक्रम

राख्या वाढवणार कारगिलमधील जवानांचा ‘विश्वास’
ठाणे : ठाण्याची बाजारपेठ रंगीबेरंगी राख्यांनी सजली असताना यात लक्ष वेधून घेत आहेत, त्या विशेष मुलांनी आपल्या हस्तकलेतून तयार केलेल्या राख्या. विश्वास संस्थेच्या २० विशेष मुलांनी तब्बल १७०० राख्या स्वबळावर तयार केल्या असून लवकरच ती दोन हजार राख्यांचे टार्गेट पूर्ण करणार आहेत. यातील १०० राख्या या औरंगाबादला, १५० राख्या या कारगिलमधील जवानांना, ४०० राख्या आदिवासीपाड्यांवर पोहोचल्या आहेत.
अवघ्या काही दिवसांवर रक्षाबंधन हा सण येऊन ठेपला आहे. बाजारात विविध प्रकारांच्या राख्या येत असताना दुसरीकडे विशेष मुले विशेष राख्या बनवण्यात गुंतली आहेत. जिद्द, अंगी असलेली कला, आवड या गुणांच्या जोरावर ती आकर्षक राख्या बनवत असून यंदा त्यांच्या राख्यांना तुफान प्रतिसाद मिळत आहे. विश्वास संस्थेने यंदा राख्यांच्या पॅटर्नपेक्षा रंगांवर अधिक भर दिला आहे. मणी आणि खड्यांच्या या राख्या बनवण्यास मुलांना मजा वाटत आहे. ती या कलेत इतकी तरबेज झाली आहेत की, त्यांना आता मार्गदर्शनाची फार गरज लागत नसल्याचे संस्थेच्या मुख्याध्यापिका मीना क्षीरसागर यांनी सांगितले.
गुलाबी, लाल, सोनेरी, पिवळा, हिरवा अशा अनेक रंगांत या राख्या तयार केल्या जातात. एक महिना आधीच ही मुले कामाला लागतात.
२२ वर्षांपासूनची परंपरा
२२ वर्षांपासून आजतागायत राख्या बनवण्याची कला या संस्थेत जोपासली जात आहे. क्षीरसागर या नेहमीच राख्यांमध्ये नवनवीन प्रयोग करून त्यांच्याकडून वेगवेगळ्या आकारांच्या, प्रकारांच्या राख्या बनवून घेत असतात. यंदा त्यांनी त्यांच्याकडून कलरफुल राख्या बनवून घेतल्या आहेत.