टिपू सुलतानऐवजी मिरा रोडच्या चौकाला आता अशफाकउल्ला खान यांचे नाव; भाजप आणि काँग्रेस नगरसेवकांमध्ये खडाजंगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 07:49 IST2026-02-19T07:48:36+5:302026-02-19T07:49:58+5:30
मिरा रोडच्या नया नगर भागातील एका चौकाला २०१६ मध्ये भाजपच्याच नगरसेवकांनी ठराव करून टिपू सुलतान यांचे नाव दिले होते. मात्र, पालिका निवडणुकीचा निकाल लागल्यावर भाजपनेच टिपू सुलतान यांचे नाव काढून टाकण्याचा प्रस्ताव महासभेत आणला.

टिपू सुलतानऐवजी मिरा रोडच्या चौकाला आता अशफाकउल्ला खान यांचे नाव; भाजप आणि काँग्रेस नगरसेवकांमध्ये खडाजंगी
मिरा रोड : मिरा रोडच्या एका चौकाला दिलेले टिपू सुलतान यांचे नाव काढून टाकून भाजपने बुधवारी झालेल्या पालिकेच्या महासभेत अशफाकउल्ला खान यांचे नाव देण्याचा ठराव केला. भाजप आणि काँग्रेस नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली. भाजपकडून माजी पंतप्रधान राजीव गांधी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, महात्मा गांधी यांच्या वक्तव्यांचा उल्लेख केला असता, काँग्रेसने एपस्टीन फाईल, मोदींवर बोलायचे का? असा पलटवार केला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
मिरा रोडच्या नया नगर भागातील एका चौकाला २०१६ मध्ये भाजपच्याच नगरसेवकांनी ठराव करून टिपू सुलतान यांचे नाव दिले होते. मात्र, पालिका निवडणुकीचा निकाल लागल्यावर भाजपनेच टिपू सुलतान यांचे नाव काढून टाकण्याचा प्रस्ताव महासभेत आणला. त्यावरून महासभेत वातावरण तापले. विकास आघाडीचे गटनेते जय ठाकूर यांनी सांगितले की, टिपू सुलतान यांच्याबद्दल महात्मा गांधी, राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गौरवोद्गार काढले होते. दोन्ही राष्ट्रपती हे टिपू सुलतानबद्दल चुकीचे बोलले होते का? इंग्रजांसमोर शरणागती न पत्करता त्यांनी देशाच्या स्वांत्र्यांसाठी युद्ध केले.
एपस्टीन फाईल, ट्रेड डील व मोदींवर बोलू काय?
काँग्रेसचे अनिल सावंत यांनी टिपू सुलतान यांचे नाव काढून टाकण्याचे कारण काय? असा सवाल केला.
भाजप गटनेते हसमुख गेहलोत यांनी त्यावर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी, बाळासाहेब ठाकरे यांची काँग्रेसबाबतची वक्तव्ये बोलून दाखवली. त्यावर जय ठाकूर यांनी टिपू सुलतान यांच्या बाबतीत विषय आहे, त्यावर बोला, असे सांगून मी ब्रिटिशांची पेन्शन खाणारे यांच्यावर बोलू काय? मी मोदींवर बोलू काय? एप्सटिन फाईल, ट्रेड डील व मोदींवर बोलू काय? असे प्रत्युत्तर दिले. यावेळी भाजप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.